खासगी कोचिंगचे विद्यार्थी गणपती विसर्जनाला गेले; दोघांचा बुडून दुर्दैवी अंत
नाशिकच्या बागलाण तालुक्यातील नामपूर येथे गणपती विसर्जनादरम्यान इयत्ता १२ वीतील दोन १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील नामपूर येथे शनिवारी दुपारी गणपती विसर्जनाच्या वेळी एक दुर्दैवी घटना घडली. खासगी क्लासच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोसम नदीवरील बंधाऱ्यावर गणपती विसर्जन करण्यासाठी गेले असताना दोन १७ वर्षीय विद्यार्थी पाण्यात बुडून मृत्यू पावले. अथर्व दीपक पगार (रा. उत्तराणे) आणि प्रसाद दादाभाऊ वाघ (रा. नामपूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. पालकांनी क्लासचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. या घटनेने नामपूर आणि परिसरात शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबे शोकात बुडाली आहेत.
दुपारी काही विद्यार्थी गणपती विसर्जनासाठी बंधाऱ्यावर पोहोचले होते. त्या वेळी अथर्व आणि प्रसाद पाण्यात उतरले. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने ते बुडू लागले. उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. परिसरातील नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली. नंतर मालेगाव येथील बचाव पथकाची मदत मागवण्यात आली. बचाव पथकाने शोधमोहीम राबवून दोन्ही विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृतदेह नामपूर येथील रुग्णालयात वैद्यकीय प्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले.

अथर्वचे वडील कमलाकर पगार यांनी दिलेल्या जबाबात क्लास संचालक विवेक अशोक पाटील यांच्यावर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, पालकांची परवानगी न घेता क्लासचालकाने विद्यार्थ्यांना विसर्जनासाठी नेले. या वेळी दोन शिक्षिका आणि १० ते १५ विद्यार्थी सोबत होते. वडिलांनी क्लासचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी सुरू केली असून पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
ही घटना पालक आणि शिक्षण संस्थांसाठी मोठा धक्का आहे. पावसाळ्यात नदी-नाल्यांमध्ये पाण्याची पातळी अचानक वाढते. त्यामुळे विसर्जनासारख्या कार्यक्रमांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. नामपूर गावात दोन्ही मुलांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गावातील वातावरण शोकाकुल झाले आहे. प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे कडक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.