शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी पार पाडली : डॉ. प्रवीण दबडघाव
बाबासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्याची काळाची गरज अधोरेखित केली. त्यासाठी शिक्षकांनी विविध कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख उपक्रमांचे आयोजन करावे, असे त्यांनी नमूद केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
"राष्ट्राचे भवितव्य हे तरुणाईवर अवलंबून असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी समाजाभिमुख संवाद साधून ग्रामीण संस्कृती, भारताचा गौरवशाली इतिहास तसेच त्याग आणि बलिदानाची प्रेरणादायी परंपरा यांची ओळख करून द्यावी." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी केले.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ (ABRSM)-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुवंदन कार्यक्रमात डॉ. प्रवीण दबडघाव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. ए. पी. कुलकर्णी, ABRSM-SPPU चे अध्यक्ष डॉ. डी. बी.पवार, डॉ. महेश अबाळे (उपाध्यक्ष, ABRSM, महाराष्ट्र राज्य) आदी उपस्थित होते.
डॉ. ए. पी. कुलकर्णी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) प्रभावीपणे राबवून भारतीय शिक्षण परंपरेला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.
बाबासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्याची काळाची गरज अधोरेखित केली. त्यासाठी शिक्षकांनी विविध कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख उपक्रमांचे आयोजन करावे, असे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात डॉ. डी. बी. पवार म्हणाले, शिक्षक हे विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत असून त्यातूनच राष्ट्रनिर्मिती घडते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विलास उगले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गरवारे कॅम्पस व ABRSM च्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहकार्य केले.
आभार प्रदर्शन डॉ. उमेश बिबवे यांनी केले. अतिथी परिचय प्रा. डॉ. सुप्रिया पाटील यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी केले.