सीईटी सेलचा मोठा निर्णय; CET सोबत १२ वी गुणांनाही महत्त्व; तज्ज्ञ समितीकडून १५ दिवसांत अहवाल येणार
सध्या केवळ एमएचटी-सीईटीच्या पर्सेंटाइलवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. मात्र आता बारावीच्या गुणांनाही योग्य प्रमाणात स्थान देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. ही समिती १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करेल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र सरकारने अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. सध्या केवळ एमएचटी-सीईटीच्या पर्सेंटाइलवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. मात्र आता बारावीच्या गुणांनाही योग्य प्रमाणात स्थान देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. ही समिती १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करेल.
सध्या अनेक विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये चांगले पर्सेंटाइल मिळते, तरीही बारावीत केवळ पात्रतेसाठी आवश्यक गुण असतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि बारावी परीक्षेचे महत्त्वही कमी झाले आहे. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी गुणवत्ता यादीत बदल करण्याबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांना प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.
समिती बारावीतील शैक्षणिक कामगिरी आणि एमएचटी-सीईटीमधील कामगिरी या दोन्हींना योग्य प्रमाणात महत्त्व देण्याची शिफारस करेल. बारावीचे गुण आणि सीईटी पर्सेंटाइल यांचे नेमके प्रमाण निश्चित करण्याची जबाबदारीही समितीकडे सोपवण्यात आली आहे. दोन्ही परीक्षांच्या निकालांमध्ये समतोल साधून गुणवत्ता यादी अधिक पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि सर्व उमेदवारांसाठी न्याय्य राहील, यासाठी गुणांकन पद्धतीचा अभ्यास केला जाईल.
समितीचे अध्यक्षपद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तथा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे अध्यक्ष सांभाळतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे यांचे कुलगुरू सदस्य असतील. उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक सदस्य तर तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सदस्य-सचिव म्हणून काम पाहतील. आवश्यकतेनुसार विषयतज्ज्ञांना बोलावण्याचा अधिकार अध्यक्षांना देण्यात आला आहे.
नवीन धोरण स्वीकारल्यास ते कधीपासून लागू करता येईल, याबाबतही समिती शिफारस करेल. विद्यार्थ्यांना बारावी आणि सीईटीची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, याचा विचार करून अंमलबजावणीची वेळ ठरवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे आगामी प्रवेश प्रक्रियेतच बदल होतील की पुढील शैक्षणिक वर्षापासून, हे समितीच्या अहवालानंतर आणि शासनाच्या अंतिम निर्णयानंतर स्पष्ट होईल.