महाविद्यालयांच्या चुकीचा भुर्दंड विद्यार्थ्यांना ; निकाल राखून ठेवण्याचा इशारा 

प्रवेश प्रक्रिया पूर्ण  झाल्यानंतर विद्यार्थ्यांची पात्रता तपासून आवश्यक कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा करणे अत्यावश्यक असताना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या १५२ महाविद्यालयांनी अद्याप १२ हजार ३९१ विद्यार्थ्यांची कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा केलेली नाहीत.

महाविद्यालयांच्या चुकीचा भुर्दंड विद्यार्थ्यांना ; निकाल राखून ठेवण्याचा इशारा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांशी संबंधित कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा करण्यास दिरंगाई झाल्यामुळे आता मुंबई विद्यापीठाचे (Mumbai University) हजारो विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे (Student documents)जमा झालेली नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले (Students results withheld)जातील, असा निर्णय विद्यापीठकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयाच्या चुकीचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसणार असल्याचे दिसत आहे. 
 प्रवेश प्रक्रिया पूर्ण  झाल्यानंतर विद्यार्थ्यांची पात्रता तपासून आवश्यक कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा करणे अत्यावश्यक असताना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या १५२ महाविद्यालयांनी अद्याप १२ हजार ३९१ विद्यार्थ्यांची कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा केलेली नाहीत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने आता आठवड्याभराची मुदत दिली आहे. या मुदतीत कागदपत्रे शुल्कासह जमा न केल्यास या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले जातील, असे मुंबई विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

 बाहेरच्या राज्यांमधून किंवा इतर विद्यापीठांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना 'मायग्रेशन' आणि 'ट्रान्सफर सर्टिफिकेट' संबंधित महाविद्यालयांकडे देणे अपेक्षित असते. ही कागदपत्रे महाविद्यालयाकडून विद्यापीठाकडे जमा होईपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवेश तात्पुरता मानला जातो. अनेक महाविद्यालयांनी  २०२१ ते  २०२४ या चार वर्षांची कागदपत्रे अद्याप विद्यापीठाकडे सादर केलेली नाहीत. काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना 'मायग्रेशन सर्टिफिकेट' किंवा 'ट्रान्सफर सर्टिफिकेट' मिळण्यात दिरंगाई होते. मात्र, विद्यार्थ्यानी कागदपत्रे जमा करून देखील काही महाविद्यालयांनी तीन -तीन वर्ष ती विद्यापीठाकडे सोपवलेली नसल्याचे विद्यापीठाच्या लक्षात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली.

डॉ. रौंदळे म्हणल्या,  "विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडवणूक होऊ नये, यासाठी या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास आडकाठी केली जात नाही, पण तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही या विद्यार्थ्यांची संबंधित कागदपत्रे विद्यापीठाकडे सादर झाली नाहीत, तर या विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणपत्रिकेची छपाईच केली जात नाही."
या महाविद्यालयांना आम्ही फेब्रुवारीची मुदत दिली होती. या मुदतीपर्यंत चार वर्षांमधील तपशील विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक होते. मात्र, महाविद्यालयांनी  काहीही कार्यवाही केली नाही. त्यानंतर ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. तरीही २०२३-२४ या वर्षासाठी १५२ कॉलेजांमधील १२ हजार ३९१ आणि २०२२-२३ वर्षासाठी ९० कॉलेजांमधील सहा हजार २०९ विद्यार्थ्यांची कागदपत्रे विद्यापीठाकडे पोहोचलेली नाहीत. हे विद्यार्थी 'तात्पुरते' असून विद्यापीठाला यांचे निकाल राखून ठेवावे लागतील,' असेही डॉ. रौंदळे यांनी सांगितले