पावनखिंडीच्या शौर्यगाथेचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी परिचय; बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत संवादात्मक सत्र
१३ जुलै १६६० रोजी झालेल्या पावनखिंडीच्या लढाईचा इतिहास, वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे अद्वितीय शौर्य, स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान प्रभावीपणे उलगडून सांगण्यात आले. तसेच पावनखिंड परिसराचे भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व, विविध प्रकारचे गड आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत देण्यात आली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पावनखिंडीत वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संवादात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात अनुभवी गिर्यारोहक प्रसाद चव्हाण आणि वरुण भागवत यांनी विद्यार्थ्यांना पावनखिंडीच्या ऐतिहासिक लढाईचा जिवंत अनुभव दिला. सहा वर्षांहून अधिक काळाच्या गिर्यारोहणाच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी महाराष्ट्रातील विविध गड-किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांबाबतची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली.
यावेळी १३ जुलै १६६० रोजी झालेल्या पावनखिंडीच्या लढाईचा इतिहास, वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे अद्वितीय शौर्य, स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान प्रभावीपणे उलगडून सांगण्यात आले. तसेच पावनखिंड परिसराचे भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व, विविध प्रकारचे गड आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत देण्यात आली.
दृकश्राव्य माध्यमातून सादर करण्यात आलेल्या या सत्रामुळे इतिहास विद्यार्थ्यांसाठी अधिक जिवंत, रंजक आणि अभ्यासाशी निगडित झाला. कार्यक्रमाच्या शेवटी दिल्ली येथील भारत मंडपम येथे प्रदर्शित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील १४ महत्त्वाच्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींवरील माहितीपट दाखविण्यात आला. या किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यामागील ऐतिहासिक महत्त्वही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. अनेक विद्यार्थ्यांना पावनखिंडीच्या इतिहासाची पूर्वकल्पना असल्याने संवाद अधिक ज्ञानवर्धक आणि रंजक ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वैशाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रसाद चव्हाण आणि वरुण भागवत यांचा सत्कार करण्यात आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शौर्य, त्याग आणि समृद्ध इतिहासाविषयी अभिमानाची भावना दृढ झाली असून इतिहास संवर्धनाची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.