म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी भक्तीरसात नाहले; पालखी सोहळ्यानिमित्त ‘एक पाऊल पर्यावरणासाठी, एक झाड भविष्यासाठी’चा संदेश
वारकरी वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, वीणा, भगवी पताका आणि तुळशी वृंदावनासह दिंडी काढली. विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या बालवाडी विभागात वारकरी संप्रदायाची परंपरा, संत संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा पालखी सोहळा बुधवारी (दि. १५ जुलै) अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावर्षी शाळेने ‘एक पाऊल पर्यावरणासाठी, एक झाड भविष्यासाठी’ ही संकल्पना राबवत पर्यावरणपूरक दिंडीचे आयोजन केले. वर्षभर पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे समन्वयक मा. श्री. पी. बी. कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ. अनिता तावरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. लखे यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. यावेळी माजी शिक्षिका सौ. पाठक मॅडम तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.वारकरी वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, वीणा, भगवी पताका आणि तुळशी वृंदावनासह दिंडी काढली. विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

विद्यार्थ्यांनी सादर केलेले अभंग, भारूड, भजन तसेच संत चांगदेव, भक्त पुंडलिक आणि संत जनाबाई यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांवरील नाट्यरूप सादरीकरणाला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली. या सादरीकरणातून भक्ती, सेवा, समता, नम्रता आणि संस्कारांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संतपरंपरेची ओळख करून देतानाच भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि नैतिक मूल्यांचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम. विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत तयार केलेले सीड्स बॉल वारकऱ्यांना वाटप करण्यात आले. प्रवासादरम्यान हे सीड्स बॉल रस्त्यालगत टाकल्यास त्यातून वृक्षांची वाढ होऊन हरितसंवर्धनाला चालना मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता. या उपक्रमाचे वारकरी व उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
या उपक्रमासाठी शाळा समितीचे अध्यक्ष मा. श्री. अजय पुरोहित, शाळेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी तसेच संस्थेच्या सर्व मान्यवर सदस्यांनी शुभेच्छा देत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे कौतुक केले. अशा संस्कारक्षम व समाजोपयोगी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवून आणणारा हा पालखी सोहळा उपस्थितांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवून गेला.