शिक्षकांना आणखी एक टास्क! एआय साथी ऑनलाइन अभ्यासक्रम अनिर्वाय, ३० सप्टेंबरची मुदत
महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पाठीवर शिक्षण विभागाने आणखी एक नवे 'टास्क' टाकला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अध्यापन आणि प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी ‘शिक्षकांसाठी एआय साथी’ हा ऑनलाइन अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गेल्या काही काळापासून विविध अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पाठीवर शिक्षण विभागाने आणखी एक नवा 'टास्क' टाकला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अध्यापन (AI-based teaching) आणि प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी ‘एआय साथी’ हा ऑनलाइन अभ्यासक्रम ('AI Saathi' Online Course) अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (SCERT) संचालक डॉ. हेमंत वसेकर (Dr. Hemant Wasekar) यांनी याबाबत आदेश जारी केले असून, हा कोर्स ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
या निर्णयामुळे शिक्षक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आधीच मतदार याद्या अद्ययावत करणे (SIR), जनगणना, निवडणूक ड्यूटी आणि इतर सरकारी कामांमुळे व्यस्त असलेल्या शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत हा अतिरिक्त डिजिटल कोर्स अनिवार्य केल्याने शिक्षकांना मोठा ताण पडणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शिक्षक संघटनांनी यावर नाराजी दर्शवली असून, अभ्यासक्रम अनिवार्य करण्याऐवजी वैकल्पिक स्वरूपात ठेवावा, अशी मागणी केली आहे.
‘एससीईआरटी’ आणि ‘कोटक एज्युकेशन फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तो ‘दीक्षा’ पोर्टलवर उपलब्ध असून, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी शिक्षक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नोंदणी करू शकतात. ‘दीक्षा’ ॲप किंवा www.diksha.gov.in या संकेतस्थळावरून हा कोर्स पूर्ण करता येणार आहे. या अभ्यासक्रमात AI च्या माध्यमातून अध्यापन कसे अधिक प्रभावी करता येईल, यासोबत प्रशासकीय कामकाजात AI चा वापर यावर भर देण्यात आला आहे.
शिक्षण विभागाने डिजिटल शिक्षण क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे. मात्र, शिक्षकांच्या विद्यमान कार्यभाराचा विचार न करता अनिवार्यता लादल्याने वाद निर्माण झाला आहे. अनेक शिक्षकांनी या कोर्सला वेळ देणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले आहे. शेवटी, हा निर्णय शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी उपयुक्त ठरेल की अतिरिक्त ओझे बनेल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.