आषाढी वारीनिमित्त हरिभाऊ गजानन देशपांडे स्कूलचा पर्यावरण जनजागृती उपक्रम; ४५० सीडबॉल्सचे वितरण; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
वारीदरम्यान विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड, पाणी बचत, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसर आणि निसर्गसंवर्धनाविषयी जनजागृती करणारे फलक हातात घेऊन नागरिकांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आषाढी वारीच्या पावन निमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामतीच्या वतीने देशमुख चौक येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करत पर्यावरण जनजागृतीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवित पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
यावेळी इयत्ता सहावीतील विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशभूषेत, तर इयत्ता सातवी ते दहावीतील विद्यार्थी शालेय गणवेशात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी "विठ्ठल... विठ्ठल..." नामाचा अखंड जयघोष आणि अभंग गायन करत पालखी सोहळ्यात पायी सहभाग नोंदविला. या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, वारकरी परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश त्यांनी दिला.
वारीदरम्यान विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड, पाणी बचत, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसर आणि निसर्गसंवर्धनाविषयी जनजागृती करणारे फलक हातात घेऊन नागरिकांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत वृक्षलागवड व स्वच्छ परिसर राखण्याचे आवाहन केले. तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, मूल्याधिष्ठित आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी शाळेत मुक्कामी असलेल्या दिंडी क्रमांक १२६ चे सहाय्यक श्री. गजानन पांडुरंग थोरात यांच्याकडे देशी वृक्षांच्या बियापासून तयार करण्यात आलेले ४५० सीडबॉल्स सुपूर्द करण्यात आले. या सीडबॉल्सपैकी काही पालखी महामार्गावरील आठ मुक्कामांच्या ठिकाणी पेरले जाणार असून उर्वरित सीडबॉल्स हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या उपक्रमाची विविध वृत्तवाहिन्या आणि स्थानिक संस्थांनी विशेष दखल घेत शाळेच्या सामाजिक बांधिलकीचे, पर्यावरणपूरक उपक्रमांचे आणि विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात येणाऱ्या संस्कारमूल्यांचे कौतुक केले.
या प्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित, महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे सदस्य राजीव देशपांडे, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पी. बी. कुलकर्णी तसेच मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्कृतीचे जतन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये दृढ करणारा हा उपक्रम उपस्थित नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.