शाळा बंद आंदोलन; शिक्षक संघटनांचा राज्यात २५ सप्टेंबर रोजी एल्गार..
राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. नवीन संच मान्यता व कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त शिक्षकांची करण्यात येणारी भरती रद्द करावी. यासारख्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवून २५ सप्टेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणात चुकीचे धोरण राबवले असल्याचा आक्षेप घेत राज्यातील शिक्षक संघटना (Teachers Association) आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे दिसत आहेत. त्यासंदर्भात राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. नवीन संच मान्यता व कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त शिक्षकांची करण्यात येणारी भरती रद्द करावी. यासारख्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बंद (Elementary school closed) ठेवून २५ सप्टेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय शिक्षक संघटनांच्या बैठकीत (Meeting of teachers unions) घेण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष केले आहे. दुसरीकडे १५ मार्च संचमान्यता व २० अथवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील एक शिक्षक पद बंद करून कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही निर्णयाच्या परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षणच बंद होण्याची स्थिती आहे.
काही विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र नसल्याने आधार कार्ड निघत नाही. या वास्तवाकडे दुर्लक्ष करून आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक संच निर्धारणासाठी व योजनांच्या लाभासाठी ग्राह्य न धरण्याची शासनाची भूमिका अचंबित करणारी आहे. अशाप्रकारच्या शासन धोरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा बंद करून खाजगीकरण करणे आणि विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या दर्जेदार शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याच्या शासन धोरण असल्याचा आरोप राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी केला आहे.
पुणे येथे शिक्षक भवनात प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. मंगळवार १७ सप्टेंबर पासून शिक्षकांनी काळी फीत लावून सरकार विरोध प्रदर्शन करणे. बुधवार १८ सप्टेंबर पासून WhatsApp च्या कथीत प्रशासनिक ग्रुपमधून बाहेर पडून असहकार सुरू करणे. २५ सप्टेंबर रोजी सर्व शिक्षकानी रजेवर जात प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढणे अशाप्रकारे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.