व्हीआयटीने नियमबाह्य प्रवेश राबवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप; मुर्दाबादच्या घोषणा
पुण्यातील काही नामांकित शैक्षणिक संस्थांनी प्रवेश प्रक्रिया राबविल्याचा आरोप करत विद्यार्थी व पालकांनी शैक्षणिक संस्थांच्या आवारामध्ये गोंधळ घालून घोषणाबाजी केली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET Cell) नियमांना डावलून पुण्यातील काही नामांकित शैक्षणिक संस्थांनी प्रवेश प्रक्रिया राबविल्याचा आरोप करत विद्यार्थी व पालकांनी शैक्षणिक संस्थांच्या आवारामध्ये गोंधळ घालून घोषणाबाजी केली. चोर है चोर है... व्हीआयटी चोर है .... मुर्दाबाद... मुर्दाबाद व्हीआयटी (VIT) मुर्दाबाद...अशा घोषणा विद्यार्थी व पालकांनी दिल्या. त्यामुळे आता सीईटी सेल व तंत्र शिक्षण विभाग (CET Cell and technical education department )संबंधित शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेची तपासणी करणार आहे का ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सीईटी सेलच्या माध्यमाच्या मार्गदर्शक तत्वानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रिया राबविले जाते. सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीतील नियम क्रमांक 13 मधील a ते j या नियमांचे पालन करून शैक्षणिक संस्थांनी संस्था स्तरावरील व कॅप राऊंड नंतर शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शैक्षणिक संस्थांनी या नियमांचे पालन न केल्यामुळे संबंधित संस्थांचे प्रवेश रद्द केले जातील, असे पत्र सीईटी सेल व तंत्र शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांना पाठविले आहे. काही दिवसांपूर्वी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी अर्थात पीआयसीटी या शैक्षणिक संस्थेचे नियमबाह्य प्रवेश रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते.
सीईटी सेलने संस्था स्तरावरील प्रवेशासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 15 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात होते. मात्र, काही शैक्षणिक संस्थांनी नियमबाह्य प्रवेश केल्याचे विद्यार्थी व पालकांना आढळून आल्यामुळे त्यांनी घोषणाबाजी करत संस्थेचा परिसर दणाणून सोडला.
व्हीआयटी या शैक्षणिक संस्थेच्या आवारात विद्यार्थी व पालकांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही.प्रवेश प्रक्रिये राबवताना नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे सीईटी सेल व तंत्र शिक्षण विभाग या प्रवेश प्रक्रियेची तपासणी करणार का ?असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.
दरम्यान, युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी याबाबत 'एक्स' या सोशल मीडिया हँडल वरून शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाच्या गोंधळाबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत जनजागृती केली जात असून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यात लक्ष घालावे,अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे नियमबाह्य प्रवेश रद्द करून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.