एआय मानवी बुद्धिमत्तेचा पर्याय नाही;तर मानवी क्षमतांना अधिक प्रभावी बनविणारे शक्तिशाली साधन
पिंपळगाव बसवंत येथील मविप्रच्या कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग आणि आयक्यूएसीच्या संयुक्त विद्यमाने मविप्र एआय क्लब आणि सायन्स असोसिएशनचे उद्घाटन करण्यात आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) शिक्षण, संशोधन, आरोग्य, उद्योग, पर्यावरणापासून दैनंदिन जीवनापर्यंतच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. एआय हा मानवी बुद्धिमत्तेचा पर्याय नसून मानवी क्षमतांना अधिक प्रभावी बनविणारे शक्तिशाली साधन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयचे केवळ वापरकर्ते न बनता नवोपक्रमाचे निर्माते व्हावे आणि या तंत्रज्ञानाचा सर्जनशील, नैतिक व जबाबदार वापर करावा, असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यामंदिरच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालय, निमगावचे प्राचार्य डॉ. अरुण व्ही. पाटील यांनी केले.
पिंपळगाव बसवंत येथील मविप्रच्या कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग आणि आयक्यूएसीच्या संयुक्त विद्यमाने मविप्र एआय क्लब आणि सायन्स असोसिएशनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्ता : व्याप्ती आणि संधी’ या विषयावर डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंतराव बी. कदम होते.
डॉ. पाटील यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना, तिचा विकासाचा इतिहास तसेच मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि संगणकीय दृष्टी या एआयच्या प्रमुख क्षेत्रांची माहिती दिली. मोठ्या प्रमाणातील माहितीचे वेगाने विश्लेषण, नमुने ओळखणे, मानवी चुका कमी करणे आणि संशोधनाला गती देणे यामध्ये एआयची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतासाठी बहुभाषिक एआय, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासनाच्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत, असे सांगताना त्यांनी अमेरिका, चीन आणि युरोपमधील एआयविषयक धोरणांचाही आढावा घेतला. भारताच्या ‘इंडिया एआय मिशन’मध्ये संगणकीय क्षमता, एआय मॉडेल्स, डेटासेट्स, कौशल्यविकास, स्टार्टअप्स तसेच सुरक्षित आणि विश्वासार्ह एआयवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भविष्यात मानव आणि एआय यांच्या सहकार्यावर आधारित संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे. मात्र एआयच्या वाढत्या वापरासोबत माहितीची गोपनीयता, तंत्रज्ञानातील पूर्वग्रह, पारदर्शकता, डिजिटल दरी, संशोधकांचे प्रशिक्षण आणि जबाबदार वापर या आव्हानांकडेही गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
‘विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे वापरकर्ते नव्हे, तर नवोपक्रमाचे निर्माते बनविणे’ हा एआय क्लब आणि सायन्स असोसिएशनच्या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्राचार्य डॉ. वसंतराव बी. कदम यांनी सांगितले.
प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. ए. एन. मेदने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. किरणकुमार जोहरे यांनी करून दिला, तर आभार डॉ. ए. एल. तिदार यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. प्रियांका निकम यांनी केले.
यावेळी प्रा. भगवान कडलग, डॉ. ज्ञानेश्वर सातभाई, डॉ. अरुण भगरे, डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. प्रशांत कोळी, डॉ. संदीप माळी, डॉ. संपत खैरनार, डॉ. सुलभा लालसरे, प्रा. ऋतुजा जाधव, प्रा. नीलम उफाडे, प्रा. गायत्री वीर, प्रा. राणी जगताप आदी उपस्थित होते.