सारथी : परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवरील खर्चाची कमाल मर्यादा रद्द

महाराष्ट्र सरकारने 'सारथी' परदेश शिष्यवृत्तीसाठीची खर्चाची मर्यादा पूर्णपणे रद्द केल्यामुळे मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सारथी : परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवरील खर्चाची कमाल मर्यादा रद्द
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. अंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलन सुरू असतानाच राज्य सरकारने मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सारथी योजनेअंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवरील खर्चाची कमाल मर्यादा नियोजन विभागाने पूर्णपणे रद्द केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे जागतिक दर्जाच्या नामांकित विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत मराठा व कुणबी विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत सकारात्मक संदेश गेला आहे. शिष्यवृत्ती मर्यादा रद्द झाल्याने अधिक विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी पात्र ठरू शकतील.
दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. जरांगे पाटील यांनी ५८ लाख कुणबी नोंदींची ग्रामपंचायत स्तरावर अमलबजावणी आणि मराठा समाजाला ओबीसी सवलती देण्याची मागणी लावून धरली आहे. जात पडताळणी समित्या गरीब मराठ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या मागण्यांवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. नियमांना डावलून निर्णय झाल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. जात पडताळणी समित्यांवर दबाव असल्याचा दावाही त्यांनी केला.
जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या इशाऱ्याला चोख प्रत्युत्तर दिले. एकीकडे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आंदोलनाच्या पवित्र्यात असताना भुजबळांच्या वक्तव्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारला दोन्ही बाजूंना समतोल साधत निर्णय घ्यावे लागतील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशा अपेक्षा शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.