संचमान्यता निकष बदलाला विरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर;प्रचलित पद्धतीनेच संचमान्यता करण्याची मागणी
ऑनलाइन संचमान्यतेसाठी विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताला बाधक ठरणारे कोणतेही नियम लादू नयेत, तर प्रचलित निकषांनुसारच संचमान्यता करण्यात यावी; अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
कनिष्ठ महाविद्यालयीन ऑनलाइन संचमान्यतेसाठी लागू करण्यात येत असलेले सुधारित निकष नियमबाह्य असून, त्याचा विद्यार्थी आणि शिक्षकांवर विपरीत परिणाम होणार आहे.त्यामुळे सुधारित निकष रद्द करून गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या निकषांनुसारच संचमान्यता करण्यात यावी, अशी मागणीसाठी राज्यभरातून हजारो शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करून तीव्र आंदोलन केले. सुधारीत संचमान्यता रद्द करण्याबरोबरच इतर प्रमुख मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे पदाधिकारी प्रा. संतोष फाजगे, प्रा. लक्ष्मण रोडे, प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. मुकुंद आंदळकर, प्रा. डॉ. संजय शिंदे यांच्यासह माजी आमदार दत्ता सावंत, भगवान साळुंखे,आगामी पुणे शिक्षक मतदार संघ निवडणुकीस इच्छुक उमेदवार प्रा.सचिन सानप, कौस्तुभ गावडे, विक्रम काळे, डॉ.अशोक गव्हाणकर,डॉ.अविनाश बोर्डे, रवींद्र पाटील, रविंद्र भदाणे, दिलीप शितोळे आदी उपस्थित होते.या आदोलनास राज्यभरातून शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान,ऑनलाइन संचमान्यतेतील निकषांमध्ये बदल करण्याच्या प्रस्तावाला महासंघाने यापूर्वीही विरोध केला आहे. याबाबत शासनाकडे निवेदने देणे, अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे तसेच विविध टप्प्यांवर आंदोलने करण्यात आली. ११ मे २०२६ रोजी मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर महासंघाने वेळोवेळी धरणे आंदोलन केले होते.शिक्षण विभागाच्या कार्यालयावर ४ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्याबाबत प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी मोर्चा तसेच धरणे आंदोलनास परवानगी नाकारल्याने महासंघाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

संतोष फासगे म्हणाले, महासंघाने सुधारीत संचमान्यता नाकारली असून तसे पत्रही दिले आहे. सुधारित संचमान्यतेमुळे शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने प्रचलित संचमान्यता कायम ठेवावी, अशी महासंघाची भूमिका आहे.
प्रा. सचिन सानप म्हणाले, सर्व संघटनांचा सुधारित संचमान्यतेला कडाडून विरोध आहे.मॉडर्न एज्युकेशन सोसायटीने शासनाची ही सुधारित संचमान्यता नाकारली असून शिक्षण विभागाला याबाबत लेखी पत्र दिले आहे.आमच्या संस्थेप्रमाणे इतरही संस्थांनी ही संचमान्यता नाकारावी, असे आवाहन सानप यांनी केले.
वरिष्ठ महाविद्यालयास जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील तासिकेचा कालावधी पूर्वीप्रमाणे ४५ मिनिटांचा ठेवावा ,विज्ञान विषयाच्या प्रॅक्टिकल बॅचसाठी पूर्वीप्रमाणे २० विद्यार्थ्यांची मर्यादा कायम ठेवावी. ती ३० विद्यार्थ्यांपर्यंत वाढवू नये, अशी महासंघाची प्रमुख मागणी आहे.

शासन नियमानुसार पूर्णवेळ शिक्षकांचा आठवड्याचा कार्यभार १७ घड्याळी तास, तर अर्धवेळ शिक्षकांचा कार्यभार ८.३० तास असावा, शासन आदेशानुसार आदिवासी व डोंगराळ भागात २० ते ३० विद्यार्थ्यांसाठी एक तुकडी मंजूर करावी,शासन आदेशानुसार एखाद्या तुकडीत १५ मुली असतील, तर ती तुकडी मान्य करावी, तसेच ४० किंवा ३० विद्यार्थी असलेल्या तुकड्यांबाबत शासन आदेशानुसार आर्थिक दंडाची तरतूद लागू करून तुकडी मंजूर करण्याची मागणी महासंघाने केली आहे.
वेगवेगळ्या सत्रांत तसेच वेगवेगळ्या शाखा व वर्गांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे नोंद करून त्यानुसार तुकडी आणि शिक्षकांचा कार्यभार निश्चित करावा. स्वाध्यायाऐवजी विज्ञान विषयासाठी प्रात्यक्षिक घेण्याची विद्यमान मुभा कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शासनाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संचमान्यतेसाठी ग्राह्य धरावे, ऑनलाइन संचमान्यतेसाठी विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताला बाधक ठरणारे कोणतेही नियम लादू नयेत, तर प्रचलित निकषांनुसारच संचमान्यता करण्यात यावी; अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.