अभ्यास व परीक्षेच्या तणावातून १६ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वडीलांच्या डोळ्यादेखत हृदयद्रावक घटना
बारामतीमधील एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा निवासी इमारतीवरून पडून मृत्यू झाला. परीक्षेच्या तणावाबाबतच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने आज ४ सप्टेंबर रोजी पहाटे टोकाचे पाऊल उचलले. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली पडून ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना पहाटे सुमारे ५ वाजता तिचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बारामती शहर पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.
पीडित विद्यार्थिनी बारामती येथील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. पालकांनी पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ती अभ्यास व परीक्षेच्या तणावात होती. अभ्यास व्यवस्थित होत नसल्याचे आणि परीक्षेचे टेन्शन येत असल्याचे तिने आई-वडिलांकडे सांगितले होते. रात्री सुमारे १२.३० वाजेपर्यंत ती अभ्यास करत होती. त्यानंतर टेरेसवर जाऊन येत असल्याचे सांगून ती वर गेली. बराच वेळ होऊनही ती खाली न आल्याने वडील तिला पाहण्यासाठी गेले. त्यावेळी ती टेरेसच्या कड्यावर बसलेली दिसली. वडिलांनी विचारणा केली असता तिने अचानक खाली उडी मारली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विद्यार्थिनी इमारतीसमोरील भागात पडली असल्याने तिला गंभीर दुखापत झाली. आई-वडील व शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान काही काळ ती शुद्धीवर होती आणि तिने आईकडे पाणी मागितले होते. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत पालकांनी किंवा नातेवाईकांनी कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तक्रार किंवा संशय व्यक्त केलेला नाही. अभ्यास व परीक्षेचा ताण असल्याची प्राथमिक माहिती दिली गेली असली तरी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. पोलिस सखोल चौकशी करत आहेत.
ही घटना विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक तणावाच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा बोट दाखवते. परीक्षेच्या दबावामुळे अनेक तरुण-तरुणी मानसिक ताणात जगत असतात. पालक, शिक्षक आणि समाजाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अशा दुःखद घटना टाळण्यासाठी समुपदेशन सेवा, खुली चर्चा आणि समर्थनाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. बारामतीतील ही घटना परिसरातील लोकांसाठी धक्कादायक ठरली असून चौकशीचा अहवाल येईपर्यंत अधिक स्पष्टता येईल.