राखीच्या धाग्यातून जवानांप्रती कृतज्ञतेची भावना
भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड यांच्या वतीने क्विन्स मेरी इन्स्टिट्यूट फॉर डिफरंटली एबल्ड सोल्जर्स येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनाचा सण महत्त्वपूर्ण ठरतो. भाऊ-बहिणीचे नाते अतूट असून, सैनिकही या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. विद्यार्थ्यांनी सैनिकांना राखी बांधून आणि भेटवस्तू देऊन त्यांच्याप्रती असलेला आदर व्यक्त केल्याने विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची आणि भारतीय संस्कृतीची भावना रुजते, असे प्रतिपादन कर्नल डॉ. वसंत बल्लेवार यांनी केले.
भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड यांच्या वतीने क्विन्स मेरी इन्स्टिट्यूट फॉर डिफरंटली एबल्ड सोल्जर्स येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कर्नल डॉ. वसंत बल्लेवार बोलत होते.
यावेळी डॉ. नंदकुमार एकबोटे म्हणाले, गेल्या १५ वर्षांपासून जवानांसाठी देशाच्या सीमेवर राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविला जात आहे. विविध भगिनींनी पाठविलेल्या राख्या एकत्र करून त्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचविल्या जातात.

सैनिकांना ‘भाऊ’ म्हणून संबोधण्याची परंपरा असलेला भारत हा एकमेव देश आहे. सैनिकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात नायक सुभेदार हवालदार संदिपजी इंदलकर यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. नायक गुरुचरण सिंग आणि रायफलमन लोकेश यांनीही आपल्या सेवाकाळातील अनुभव कथन केले.अभिनेत्री पूजा पवार यांनी सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. सौ. समृद्धी एकबोटे यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंजुषा कुलकर्णी, मधुसूदन शिंदे आणि विद्यार्थिनी श्रेया पवार यांनी केले. पाहुण्यांची ओळख विधी पांडव आणि रीमी सेन यांनी करून दिली. कार्यक्रमास डॉ. दीपक शेंडकर, प्रा. कुमोद सपकाळ, डॉ. गोविंद कांबळे यांच्यासह एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.