राज्यात अडीच लाख शिक्षक ‘ऑल इन वन’; एका शिक्षकाच्या खांद्यावर सर्व विषयांचे ओझे; सरकारच्या अहवालातून समोर

महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असून ३३.११% शिक्षक सर्वच विषय शिकवत आहेत; यामुळे विषयनिहाय अध्यापन आणि मराठी भाषेच्या अध्यापनाबाबत चिंता निर्माण झाली आहे.

राज्यात अडीच लाख शिक्षक ‘ऑल इन वन’; एका शिक्षकाच्या खांद्यावर सर्व विषयांचे ओझे; सरकारच्या अहवालातून समोर
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
राज्यातील शाळांमध्ये एकाच शिक्षकाने सर्व विषय शिकवण्याची पद्धत अनेक दशकांपासून सुरू असली तरी आता ती अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. बदलत्या संचमान्यता आणि शाळांच्या वर्गवारीमुळे भाषा, गणित, विज्ञान तसेच सामाजिक शास्त्रे अशा विविध विषयांचे अध्यापन एकाच शिक्षकाच्या खांद्यावर पडत आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शालेय शिक्षण विभागाच्या आकडेवारीतून हे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.
राज्यात पहिली ते बारावीपर्यंत एकूण १ लाख ८ हजार ९५ शाळा असून त्यामध्ये २ कोटी १५ लाख ३२ हजार ३८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अवाढव्य पटसंख्येसाठी ७ लाख ४६ हजार ३७७ शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी तब्बल २ लाख ४७ हजार १२७ म्हणजे ३३.११ टक्के शिक्षक ‘ऑल इन वन’ म्हणून सर्व विषय शिकवत आहेत. विषयनिहाय आकडेवारीनुसार इंग्रजी शिकवणारे ८१ हजार ७१६, गणिताचे ७९ हजार ८०२, विज्ञानासाठी ५८ हजार ५१ तर हिंदीसाठी ४३ हजार ७३१ शिक्षक आहेत.
जिल्हानिहाय शिक्षकांची संख्या पाहता पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७८ हजार ३३ शिक्षक कार्यरत आहेत. त्यानंतर ठाणे ५० हजार ४१५, नाशिक ४० हजार ६५७, मुंबई ३७ हजार ७६६, नागपूर ३२ हजार ८००, छत्रपती संभाजीनगर ३२ हजार १७९ आणि अहिल्यानगर ३० हजार ९९५ शिक्षक आहेत. सिंधुदुर्गात सर्वात कमी अवघे ५ हजार ७०१ शिक्षक आहेत. भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही शिक्षकसंख्या दहा हजारांपेक्षा कमी आहे. ‘सर्व विषय’ शिकवणाऱ्या शिक्षकांचा भार पुणे, नाशिक, ठाणे, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा उत्सव साजरा होत असताना शाळांमध्ये मात्र माय मराठीची उपेक्षा स्पष्ट दिसते. इंग्रजी आणि हिंदीसाठी मोठ्या संख्येने स्वतंत्र शिक्षक असताना मराठी शिकवण्यासाठी स्वतंत्रपणे नियुक्त शिक्षकांची संख्या अवघी ११ हजार ३३७ म्हणजे केवळ १.५२ टक्के इतकी नगण्य आहे. ‘ऑल इन वन’चा ताण आता केवळ प्राथमिक स्तरापुरता मर्यादित राहिलेला नसून माध्यमिक स्तरावरही पसरत आहे. प्राथमिक स्तरावर विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक दिले जातात तर माध्यमिकमध्ये कला आणि विज्ञान पदवीधरांच्या तासिकांचा आकृतीबंध ठरलेला आहे. मात्र संचमान्यतेतील जाचक अटींमुळे मंजूर पदे कमी झाली आणि सेवानिवृत्तीनंतरच्या रिक्त जागांवर भरती न झाल्याने अनेक शिक्षकांना स्वतःचा विषय नसताना इतर विषय शिकवावे लागत आहेत.
राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी सांगितले की, प्राथमिक स्तरावर डीएड शिक्षकांकडून सर्व विषय शिकवण्याची अपेक्षा स्वाभाविक असली तरी माध्यमिकसाठी निश्चित आकृतीबंध असूनही संचमान्यतेतील त्रुटींमुळे शिक्षकांवर अतिरिक्त भार पडतो आहे. पवित्र पोर्टलमधून वर्षातून दोनदा भरतीचे आदेश असताना गेल्या सहा-सात वर्षांत केवळ तीनदाच भरती झाली. ही उदासीनता विद्यार्थ्यांच्या पायाभूत गुणवत्तेवर गदा आणणारी आहे.