मुंबई विद्यापीठात लवकरच सुरू करणार ई-कंटेंट स्टुडिओ आणि स्मार्ट क्लासरूम 

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक ई-कंटेंट स्टुडिओ आणि स्मार्ट क्लासरूमची उभारणी केली जात असून ते लवकरच सुरू केले जाणार आहे. यासाठी मॉस्को विद्यापीठाचे सहकार्य घेतले जाणार असून, यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणे शक्य होणार आहे.

मुंबई विद्यापीठात लवकरच सुरू करणार ई-कंटेंट स्टुडिओ आणि स्मार्ट क्लासरूम 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
 
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात खुप मोठे बदल होताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई विद्यापीठात (Mumbai University) अत्याधुनिक ई-कंटेंट स्टुडिओ आणि स्मार्ट क्लासरूमची उभारणी (Establishment of e-content studio and smart classroom) केली जात असून ते लवकरच सुरू केले जाणार आहे. यासाठी मॉस्को विद्यापीठाचे सहकार्य (Cooperation with Moscow University) घेतले जाणार असून, यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणे शक्य होणार आहे. तसेच विद्यापीठातील प्राध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी स्मार्ट क्लासरूम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केले आहे. 

विद्यापीठाच्या कलिना संकुलातील शंकरराव चव्हाण शिक्षक प्रशिक्षण अकादमीच्या इमारतीत अत्याधुनिक ई-कंटेंट स्टुडिओ आणि स्मार्ट क्लासरूमची उभारणी केली जात आहे. रशियातील मॉस्को येथील आर्ट-पॉडगोटोव्हका या स्वायत्त बिगर-व्यावसायिक संस्थेने त्याच्या निर्मितीसाठी ३५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. ई-कंटेंट स्टुडिओ आणि स्मार्ट क्लासरूमच्या मदतीने शिक्षक प्रशिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडवणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे शिक्षकांना नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती विकसित करण्यासाठी मदत मिळणार आहे. शैक्षणिक आशय वृद्धीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे, तसेच त्यांना अत्याधुनिक शिक्षण साधनांची ओळख होण्यासह अधिक सक्षम करण्यास मोठा हातभार लागणार आहे, असे मुंबई विद्यापीठाने सांगितले. 

मुंबई विद्यापीठ आणि मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीच्या सहकार्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या उपयोगावर भर दिला जाणार आहे. शिक्षण आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या क्लासरूमच्या मदतीने शिक्षक प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यात आणि विद्यार्थ्यांना डिजिटल युगासाठी तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाईल, असा आशावाद कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.