TET पेपरफुटी प्रकरणात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी; NSUI आक्रमकम

दादा भुसे यांनी पुढील सात दिवसांत जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही तर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना, समविचारी पक्ष आणि गट यांच्या सहकार्याने राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल. लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या स्वप्नांवर पाणी पडल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे एनएसयूआयचे अध्यक्ष सागर साळुंखे यांनी सांगितले.

TET पेपरफुटी प्रकरणात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी; NSUI आक्रमकम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

हाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फुटीच्या प्रकरणाने (Paper leak case) राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस पक्षाने राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. काँग्रेसची विद्यार्थी संघटना महाराष्ट्र प्रदेश नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (NSUI) या प्रकरणात भाजप-महायुती सरकारवर तीव्र टीका केली. NEET पेपरफुटी (NEET paper leak) प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.

एनएसयूआयने सरकारच्या अकार्यक्षमतेवर हल्ला चढवला आहे. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी स्पष्ट इशारा दिला की, दादा भुसे यांनी पुढील सात दिवसांत जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही तर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना, समविचारी पक्ष आणि गट यांच्या सहकार्याने राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल. लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या स्वप्नांवर पाणी पडल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे एनएसयूआयचे अध्यक्ष सागर साळुंखे यांनी सांगितले.

सरकारच्या धोरणांमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. शिक्षण क्षेत्राला जनसेवेच्या ऐवजी पैशाच्या कमाईचे साधन बनवण्यात आले आहे. शिक्षकांना बूथ लेव्हल ऑफिसरची जबाबदारी देण्यात आल्याने शाळांकडे दुर्लक्ष होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम झाला असल्याचे साळुंके यांनी म्हटले आहे. 

शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय शिक्षण विभागात प्रशासकीय गोंधळाचे वातावरण असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांची फसवणूक होत असून त्यांना हजारो रुपयांची रक्कम भरण्यास भाग पाडले जात आहे. राज्यभर बोगस नर्सिंग शाळा फोफावल्या असल्याचेही सांगण्यात आले. पुण्यातील सीईओपी कॉलेजमध्ये विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क आणि शिक्षण शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून प्रचंड रक्कम वसूल केली जात असल्याचे उदाहरण देण्यात आले. 

एनएसयूआयने उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही अतिरिक्त शुल्क आकारणीला परवानगी दिल्याचा आरोप केला आहे. शिक्षण विभाग हा केवळ महसूल मिळवण्याचा व्यवसाय बनला असल्याचे साळुंखे यांनी टीकास्त्र सोडले. TET पेपरफुटी प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास विद्यार्थी आंदोलन अधिक तीव्र होईल, असे संकेत देण्यात आले आहेत.