अंजीर बागांवरील तांबेरा रोगावर वाघिरे महाविद्यालयाचे संशोधन
या संशोधनादरम्यान पुरंदर परिसरातील १०० अंजीर बागांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये तब्बल ७५ टक्के बागांमध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील अंजीर बागांसाठी चिंतेची बाब समोर आली असून, अंजीर पिकावर आढळणाऱ्या तांबेरा रोगास कारणीभूत असलेल्या रोगकारकाची ओळख संशोधकांनी पटवली आहे. पीडीईएच्या वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील वनस्पतिशास्त्र विभागाच्या डॉ. विद्या पाटणकर आणि पीएच.डी. संशोधक प्राजक्ता कुलकर्णी यांनी चार वर्षांच्या अभ्यासातून या रोगकारकाचे नाव फाकॉपसोरा निशीडाना (Phakopsora nishidana) असल्याचे निश्चित केले आहे.
या संशोधनादरम्यान पुरंदर परिसरातील १०० अंजीर बागांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये तब्बल ७५ टक्के बागांमध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. तसेच, ८७ टक्के शेतकऱ्यांनी बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात मोठी घट होत असल्याचे नमूद केले.
तांबेरा रोगाची सुरुवात अंजीराच्या पानांच्या खालच्या बाजूस लालसर-नारिंगी डाग पडण्यापासून होते. रोगाची तीव्रता वाढल्यास पाने वाकणे, अकाली गळणे आणि परिणामी फळधारणेत घट होणे, अशी लक्षणे दिसून येतात. तीव्र प्रादुर्भाव झालेल्या बागांमध्ये दरवर्षी प्रति एकर सुमारे ११ हजार रुपयांचे उत्पादनमूल्य कमी होऊ शकते. तर शेतस्तरावर सरासरी ४७ हजार ३०० रुपयांपर्यंत नुकसान होण्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.
या अभ्यासाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संशोधकांनी फाकॉपसोरा निशीडाना या रोगकारकाचा पहिला संपूर्ण जीनोम क्रम तयार केला आहे. या जीनोम माहितीच्या आधारे भविष्यात तांबेरा रोगास प्रतिकार करणारे अंजीर वाण विकसित करण्याबरोबरच रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी नवीन उपाययोजना विकसित करण्यास मदत होऊ शकते.
रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी अंजीर बागांची नियमित पाहणी करावी. जास्त बाधित पाने व फांद्या काढून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. छाटणी करून बागेत हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. तसेच पानांवर दीर्घकाळ ओलावा राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. ढगाळ आणि दमट हवामानात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे. बुरशीनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या संशोधनासाठी स्थानिक अंजीर उत्पादक, पुरंदर हायलँड्स तसेच समन्वयक रोहन उरसळ यांनी क्षेत्रीय पाहणीसाठी सहकार्य केले. सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील डॉ. महेश धरणे आणि डॉ. सय्यद दस्तगीर यांनी जीनोम विश्लेषणात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आणि माजी प्राचार्य पंडित शेळके यांनी या संशोधनाला पाठिंबा दिला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घागडे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख आणि उपसचिव एल. एम. पवार यांनी संशोधन कार्याबद्दल अभिनंदन करून भविष्यातील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या. हे संशोधन अंजीर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.