शिक्षण आणि उद्योगविश्वातील दिग्गज एका मंचावर; ‘महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्स’चा दिमाखदार सोहळा
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसामान्यांना परवडणारे असण्याची गरज अधोरेखित केली. महिला सक्षमीकरण आणि उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील समन्वयावरही त्यांनी भर दिला. महिलांना शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी प्रोत्साहन देतानाच ऑनलाइन व लवचिक रोजगाराच्या संधी वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षण क्षेत्राने उद्योगविश्वाचा सन्मान करावा आणि उद्योगविश्वाने शैक्षणिक क्षेत्राचा गौरव करावा, या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्स २०२६’च्या चौथ्या पर्वाचा दिमाखदार समारोप शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी पुण्यातील सनीज वर्ल्ड येथे झाला. या सोहळ्यात शिक्षण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रत्येकी १५ अशा एकूण ३० मान्यवरांचा त्यांच्या नेतृत्वगुणांसह नावीन्यपूर्ण उपक्रम आणि सक्षम मनुष्यबळ निर्मितीतील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
पुण्यातील मनुष्यबळ व प्रतिभा व्यवस्थापन क्षेत्रातील जॉबिझ्झा संस्थेने संस्थापक डॉ. गौरव शर्मा यांच्या पुढाकारातून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले. कार्यक्रमाला शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि विविध क्षेत्रांतील ६०० हून अधिक मान्यवर उपस्थित होते. ‘पास९८’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मुलाखत-तयारी मंचाचे प्रमुख प्रायोजकत्व, तर यवतमाळ येथील जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसामान्यांना परवडणारे असण्याची गरज अधोरेखित केली. महिला सक्षमीकरण आणि उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील समन्वयावरही त्यांनी भर दिला. महिलांना शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी प्रोत्साहन देतानाच ऑनलाइन व लवचिक रोजगाराच्या संधी वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी निर्माण करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर झालेल्या उच्चस्तरीय परिसंवादात शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योगांच्या अपेक्षांमधील दरी कमी करण्यावर चर्चा झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष जगातील कौशल्ये विकसित करण्यासाठी उद्योगांच्या सक्रिय सहभागाची गरज व्यक्त केली.
सोमैया विद्याविहार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई यांनी सक्षम शिक्षक घडविणे ही देशाच्या भविष्यासाठीची गुंतवणूक असल्याचे सांगितले. पीसीएमसी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी अभ्यासक्रम आणि अध्यापन प्रक्रियेत उद्योगतज्ज्ञांचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली. जेएसपीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. बी. आहुजा, डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, एनस्क्वेअर एक्सपर्ट्सचे किरीट मांडवगणे आणि टाटा मोटर्स ग्लोबल सर्व्हिसेसचे अजय वाधवा यांनीही विचार मांडले.
कुलगुरू, अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, संस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापनातील अधिकारी अशा एकूण ३० मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
जॉबिझ्झाचे संस्थापक डॉ. गौरव शर्मा यांनी शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील कौशल्याची दरी दूर करून परस्पर संवादाचे व्यासपीठ निर्माण करणे हा पुरस्कार सोहळ्यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये मिळावीत आणि सक्षम प्रतिभाव्यवस्था उभी राहावी, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.