खड्डेमुक्त आणि सुरक्षित रस्त्यांसाठी अभिनव संकल्पना; विद्यार्थ्यांनी शोधला नवा मार्ग

 राजवर्धन ठाकूर यांनी भारतीय रस्त्यांच्या समस्यांचा सखोल अभ्यास करत या प्रकल्पाची संकल्पना मांडली. पावसाळ्यात पडणारे खड्डे, रस्त्यांवरील तडे आणि त्यातून होणारे अपघात यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न त्यांनी अथर्व देशमुख यांच्या सहकार्याने केला.

खड्डेमुक्त आणि सुरक्षित रस्त्यांसाठी अभिनव संकल्पना; विद्यार्थ्यांनी शोधला नवा मार्ग
Engineering students showcase their innovative Bio-Based Self-Healing and Night Visibility Road Technology designed to reduce potholes and improve road safety. The project aims to create more durable and safer roads for the future

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशातील रस्त्यांवरील खड्डे, वाढते अपघात आणि रात्रीच्या वेळी अपुरी दृश्यता या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्याच्या उद्देशाने दोन तरुण अभियंत्यांनी विकसित केलेल्या “Bio Based Self Healing and Night Visibility Road Technology” या अभिनव संकल्पनेची जोरदार चर्चा सुरू आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारे राजवर्धन कैलासराव ठाकूर आणि अथर्व देशमुख यांनी हा संशोधनाधारित प्रकल्प विकसित केला आहे. सध्या ते मौली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत.

 राजवर्धन ठाकूर यांनी भारतीय रस्त्यांच्या समस्यांचा सखोल अभ्यास करत या प्रकल्पाची संकल्पना मांडली. पावसाळ्यात पडणारे खड्डे, रस्त्यांवरील तडे आणि त्यातून होणारे अपघात यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न त्यांनी अथर्व देशमुख यांच्या सहकार्याने केला.

या प्रकल्पासाठी दोघांनी जवळपास दहा महिने सातत्याने संशोधन, साहित्य अभ्यास, मटेरियल टेस्टिंग आणि प्रोटोटाइप निर्मितीचे काम केले. अनेक प्रयोग अपयशी ठरूनही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवत तंत्रज्ञान अधिक परिणामकारक बनविण्यावर भर दिला.

या संशोधनातून “RELVIAN GROUP” या उपक्रमाची निर्मिती झाली. रस्ते अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि कमी देखभाल खर्चाचे व्हावेत, या उद्देशाने या समूहाने विशेष बायो-बेस्ड घटक, मायक्रोफायबर आणि बॅक्टेरिया-आधारित तंत्रज्ञानावर काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार, सेल्फ-हिलिंग सिमेंट तंत्रज्ञानामध्ये ७० ते ८५ टक्क्यांपर्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे रस्त्यावर तडे गेल्यानंतर पावसाच्या पाण्याच्या संपर्कात येणारे जैवाधारित घटक सक्रिय होऊन तडे नैसर्गिकरीत्या भरून काढण्यास मदत करतात. त्यामुळे खड्डे निर्माण होण्यापूर्वीच नुकसान नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. परिणामी, रस्त्यांच्या वारंवार दुरुस्तीवरील खर्चातही बचत होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, रात्रीच्या वेळी रस्त्यांची दृश्यता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी “Night Visibility Technology” विकसित केली आहे. ग्लोइंग रोड पेंटच्या माध्यमातून रोड मार्किंग, डिव्हायडर आणि वळणे अधिक स्पष्टपणे दिसावीत, यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातील काही तंत्रज्ञानाचा अभ्यास करून भारतीय परिस्थितीनुसार प्रोटोटाइप तयार केला. श्री संत गजानन महाराज मंदिर परिसर तसेच रेल्वे स्टेशन परिसरात या तंत्रज्ञानाचा प्राथमिक स्तरावर प्रयोग करण्यात आला असून त्यातून सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकल्पासाठी लागणारा खर्च विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पॉकेट मनीमधून उचलला. आर्थिक अडचणी असूनही संशोधनाची जिद्द कायम ठेवत त्यांनी हा प्रकल्प यशस्वीपणे विकसित केला.

या प्रकल्पावर आधारित रिसर्च पेपरही तयार करण्यात आले असून विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये त्याला यश मिळाले आहे. SSGMCE येथे आयोजित राष्ट्रीय प्रोजेक्ट स्पर्धेत प्रकल्पाला द्वितीय क्रमांक, तर रिसर्च पेपर स्पर्धेतही द्वितीय पारितोषिक मिळाले. तसेच जळगाव येथील गोदावरी कॉलेजमध्ये झालेल्या स्पर्धेतही या प्रकल्पाचा गौरव करण्यात आला.

या तंत्रज्ञानासाठी युटिलिटी पेटंटसाठी अर्ज दाखल करण्यात आला असून त्याचा अर्ज क्रमांक 202621043158 / E-12/4421/2026/MUM असा आहे.

याबाबत बोलताना RELVIAN GROUP चे संस्थापक राजवर्धन ठाकूर म्हणाले, “रस्त्यांमुळे होणारे अपघात कमी व्हावेत, पावसाळ्यातील खड्ड्यांची समस्या कमी व्हावी आणि रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, हा आमच्या संशोधनामागील मुख्य उद्देश आहे. भविष्यात या तंत्रज्ञानावर अधिक व्यापक संशोधन करून ते प्रत्यक्ष रस्ते प्रकल्पांमध्ये वापरण्याचे आमचे ध्येय आहे.”