आरोग्य विभागाचा मोठा निर्णय! ५ हजार नव्या पदांना मंजुरी; १४०० डॉक्टरांची थेट नियुक्ती
राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली असल्याचे सांगत आबिटकर म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ हजार ९०० सीएचओ पदेही लवकरात लवकर भरली जातील. उपजिल्हा रुग्णालयांसाठी प्रलंबित निधी आठवडाभरात वितरित केला जाईल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागातील गंभीर मनुष्यबळ कमतरता दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी विधानसभेत सांगितले की, मंत्रिमंडळाने ५ हजार नव्या पदांना मंजुरी (Approval for 5,000 new posts) दिली असून या आठवड्यातच भरती प्रक्रिया (Recruitment process) वेगाने राबवली जाईल. यासोबत डॉक्टर दिनाच्या मुहूर्तावर १ हजार ४०० डॉक्टरांच्या थेट नियुक्तीचे (Direct appointment of 1,400 doctors) आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर आणखी ६०० डॉक्टरांची भरती (Recruitment of 600 doctors) करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या सेवेत लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे.
भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, देवराव भोंगळे, डॉ. ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, अजय चौधरी, सुलभा खोडके आदींनी उपप्रश्न विचारले. राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली असल्याचे सांगत आबिटकर म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ हजार ९०० सीएचओ पदेही लवकरात लवकर भरली जातील. उपजिल्हा रुग्णालयांसाठी प्रलंबित निधी आठवडाभरात वितरित केला जाईल.
अनेक ठिकाणी रुग्णालयांच्या इमारती पूर्ण झाल्या तरी डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या अभावी सेवा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. नव्या पदमान्यतेमुळे आणि डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे रुग्णांना दर्जेदार उपचार मिळणे सोपे होईल आणि आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढेल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
करोनाकाळात अग्रेसर भूमिका बजावलेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्नही प्राधान्याने सोडवला जाईल. त्यांच्या थकबाकी तातडीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. हा निर्णय केवळ रुग्णांसाठीच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो तरुणांसाठीही दिलासादायक ठरला आहे.
आरोग्य विभागाच्या या मोठ्या भरती मोहिमेमुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत होण्याची आशा निर्माण झाली आहे. पदभरती, नियुक्त्या आणि निधी वितरण प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर सरकारचे विशेष लक्ष असल्याचे दिसते. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवाही अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.