विद्यापीठात बिरसा मुंडा यांच्या नावाने अध्यासन स्थापन करण्याचा प्रस्ताव...

पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे यांनी विद्यापीठात क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी अध्यासन स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला.त्यास डॉ. हर्ष जगझाप यांनी अनुमोदन दिले.

विद्यापीठात बिरसा मुंडा यांच्या नावाने अध्यासन स्थापन करण्याचा प्रस्ताव...

Birsa Munda: आदिवासी समाजाच्या विकासाचे प्रश्न आणि त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक, समस्यांवर संशोधन होण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बिरसा मुंडा यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या आधिसभेत रविवारी मंजूर करण्यात आला.

   पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी अधिसभेची बैठक पार पडली.यावेळी प्र कुलगुरू डॉ संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.यावेळी अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे यांनी विद्यापीठात क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी अध्यासन स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला.त्यास डॉ. हर्ष जगझाप यांनी अनुमोदन दिले.

 आदिवासी समाजाचे अर्थकारण, मौखिक परंपरेतून मिळणारे शिक्षण, पारंपरिक कायदे, जमात पंचायत, भाषा, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत सामाजिक आणि राजकीय व्यवहार हे सर्व वेगळे आहेत. त्यामुळेच या समाजावर जगातील मानववंश शास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ञ अभ्यास करण्यासाठी आकर्षित झालेले आहेत. भारतात ९.४० टक्के आदिवासींची लोकसंख्या आहे.तर जगभरात आदिवासीची लोकसंख्या २५ ते ३० कोटी एवढी आहे. संस्कृती व परंपराही इतर समाजापेक्षा वेगळी असल्याने या समाजावर विविध अंगी अभ्यास होण्याची आवश्यकता असून त्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती होणे गरजेचे आहे.

   आदिवासी समाजाचे प्रश्न गंभीर असून अलीकडे सांस्कृतिक आणि राजकीय वर्चस्ववादामुळे हे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. एकोणिसाव्या शतकात चे उत्तरार्धात झारखंड येथील बिरसा मुंडा या आदिवासी युवकाने आदिवासींच्या प्रश्नाकडे देशाचे आणि जगाचे लक्ष वेधले. दारिद्र्य आणि अज्ञानात कितपत पडणाऱ्या या समाजाच्या प्रश्नांची कोंडी फोडण्याचा प्रयत्न बिरसा मुंडा यांनी केला. त्यांनी ब्रिटिश सरकार, जमीनदार ,ठेकेदार, धर्मगुरू आणि व्यापारी यांच्याविरोधात बंड केले. हजारो आदिवासी लोक बिरसा मुंडा यांचे पाईक झाले. लोकांनी बिरसा मुंडा यांना भगवान उपाधी दिली. तसेच स्वतंत्र भारतात राष्ट्रपतींनी बिरसा मुंडा यांना राष्ट्रीय नेता युगपुरुष म्हणून घोषित केले. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बिरसा मुंडा यांच्या नावाने अध्यासन सुरू करावे, असा प्रस्ताव डॉ. राजेंद्र घोडे यांनी मांडला.

-----------

अध्यासनामुळे काय होणार? 

१) आदिवासींच्या असंशोधित इतिहासावर संशोधन व दस्ताऐवजीकरण होईल.

२) आदिवासींच्या सामाजिक ,सांस्कृतिक आणि राजकीय संस्था व चालीरीतीवर अभ्यास होईल.

३) आदिवासींच्या बोली व भाषांचे सर्वेक्षण आणि दस्ताऐवजीकरण होईल.

४) आदिवासींच्या परंपरेतील सांस्कृतिक व जीवनमूल्य यांचा अभ्यास होईल.

५) आदिवासी समाजाचे राष्ट्रीय जीवनाशी एकात्मिकरण प्रक्रियेतील अडथळ्यांचा शोध घेता येईल.

----------

अध्यासनामुळे आदिवासी  समाजाच्या संशोधनाबरोबरच आदिवासी हस्तकला चित्रकला, नृत्य यातून उद्योजकता विकास करणे यासाठी अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करता येतील. तसेच आदिवासी समाजासाठी असणारी धोरणे कार्यक्रम घटनात्मक तरतुदी विकासाचे प्रश्न यासंबंधी जागृती निर्माण करणे शक्य होईल. 

- डॉ.राजेंद्र घोडे, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ