दोन दिवसात ४७ हजार विद्यार्थ्यांचे आरटीई प्रवेश कसे होणार ?
शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी येत्या ८ मे पर्यंत मुदत दिली आहे.त्यामुळे या कालावधीत उर्वरीत विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे होणार? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क / पुणे
Right to Education Act : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांवर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आरटीई प्रवेशासाठी (RTE Admission) निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ४६ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. आता केवळ दोन दिवसात ४७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागणार आहेत. परंतु ,हे शक्य नसल्याने शिक्षण विभागाने आरटीई (RTE) प्रवेशासाठी मदतवाढ द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
आरटीई प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून राज्यातील ९० हजार ७०० विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यातील ४६ हजार ७३४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशाच्या सर्वाधिक १५ हजार ५९६ जागा असून त्यातील १५ हजार ५०१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली, यामधील ७ हजार ६६८ विद्यार्थ्यांचे प्रवेश आत्तापर्यंत निश्चित झाले आहेत. शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी येत्या ८ मे पर्यंत मुदत दिली आहे.त्यामुळे या कालावधीत उर्वरीत विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे होणार? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
आरटीई प्रवेशासाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत प्रवेश घ्यावा लागतो. परंतु, पुण्यातील एसएसपीएमएस इंग्लिश मीडियम स्कूल मधील बारावी विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात आले आहेत, अशा विविध कारणांमुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी मदत वाढ द्यावी अशी मागणी विविध पालक संघटनांकडून केली जात आहे.