SPPU : नवीन कुलगुरूंसमोर आव्हानांचा डोंगर; कोण उचलणार शिवधनुष्य? 

कुलगुरूपदासाठी इच्छुक असलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच मुंबईत झाल्या. त्यामुळे राज्यपाल कार्यालयाकडून सोमवारी किंवा मंगळवारी नव्या कुलगुरूंचे नाव जाहीर केले जाऊ शकते.

SPPU : नवीन कुलगुरूंसमोर आव्हानांचा डोंगर; कोण उचलणार शिवधनुष्य? 
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला (Savitribai phule pune university) येत्या सोमवारी किंवा मंगळवारी नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. पण सध्याची परिस्थती पाहता नवीन कुलगुरूंसमोर मोठी आव्हाने असणार आहेत. प्रामुख्याने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे शिवधनुष्य नव्या कुलगुरूंना (Vice chancellor) उचलावे लागणार आहे. त्यात विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. राज्यातील बहुतेक विद्यापीठांचे डोळे पुणे विद्यापीठाकडे लागून राहणार आहेत. त्याचप्रमाणे परीक्षा वेळेत घेण्याबरोबरच निकालाची डेडलाईन पाळण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असेल. (SPPU New VC)

कुलगुरूपदासाठी इच्छुक असलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच मुंबईत झाल्या. त्यामुळे राज्यपाल कार्यालयाकडून पुढील दोन दिवसांत नव्या कुलगुरूंचे नाव जाहीर केले जाऊ शकते. त्याकडे संपूर्ण शिक्षण जगताचे लक्ष लागले आहे. कुलगुरूंची निवड झाल्यानंतर त्यांना पहिल्या दिवसापासूनच झोकून देत काम करावे लागणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी कुलगुरूंना सज्ज राहावे लागणार आहे. तसेच राज्यपाल व कुलपती रमेश बैस यांनी परीक्षांच्या निकालावरून विद्यापीठांना नुकतेच धारेवर धरले होते. विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत.

डॉ. राम ताकवले यांच्या स्मृती जपण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार

नवीन कुलगुरूंसमोरील आव्हानांबाबत 'एज्युवार्ता'शी बोलताना पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ (Dr Arun Adsool) म्हणाले, "विद्यापीठात नुकतेच उघड झालेले BSO (बोर्ड ऑफ स्टडीज ) वरील सदस्यांची बेकायदा निवड हे प्रकरण ही नवीन कुलगुरंसमोरील मोठी समस्या असणार आहे. कारण जोपर्यंत नवीन BSO आणि अकॅडमिक कौन्सिल स्थापन होत नाही, तोपर्यंत  नवीन अभ्यासक्रमाला मान्यता देणे, त्याची तयारी या सर्व गोष्टी लांबणीवर पडतील. आपोआप या सर्वांचा परिणाम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अपेक्षेप्रमाणे अंमलबजावणी करतानाही अडचणी येणार आहेत,  गोंधळ निर्माण होणार आहे. त्यामुळे नवीन कुलगुरूंसमोर सर्वात मोठे आव्हान असणारे ते म्हणजे लवकरात लवकर BSO स्थापन करणे." 

डॉ. अडसूळ म्हणाले, "डायरेक्टर ऑफ हायर एजुकेशन त्यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार राज्यातील ३ हजार महाविद्यालयांपैकी २ हजार महाविद्यालयांनी नॅक घेतलेली नाही. अशा महाविद्यालयांचे अनुदान थांबवण्याचा इशारा संचालनालयाकडून देण्यात आला आहे. तसे घडले तर त्या महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांचे पालक, प्राध्यापक, प्राचार्य आणि संस्था असे सर्वच त्यात भरडले जातील. त्यामुळे या महाविद्यालयायामध्ये 'नॅक' विषयी जनजागृती करून ती त्यांना मिळवून देणे हे दुसरे महत्वाचे आव्हान कुलगुरंसमोर असेल." 

"केंद्र शासनाने याच वर्षापासून नवीन धोरण अवलंबण्याचे  ठरवले आहे. असे झाले तर आणखीन एक मोठी अडचण निर्माण होणार आहे. राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील सुमारे ६५ टक्के कर्मचारी वर्ग सीएचबी म्हणजेच तासावर काम करणारा आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अध्यापन करताना अभ्यासपूरक आणि व्यवसायाभिमुख असे अभ्यासक्रम शिकवावे लागतील ही सर्व जबाबदारी या सीएचबी कर्मचाऱ्यांवर देताना थोडा विचार करावा लागणार आहे. याचा ताळमेळ बसवणे प्राचार्यांना अवघड होणार आहे, अशा वेळेस त्यांना विद्यापीठाकडून म्हणजेच कुलगुरूंकडून मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवावी लागेल. यामध्ये अकॅडमिक कौन्सिलची भूमिका मोठी असणार आहे," असे डॉ. अडसूळ यांनी नमूद केले.

राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात पहिल्यांदाच सावरकर; सावित्रीबाई फुले यांचाही समावेश होणार

माजी अधिसभा सदस्य डॉ. ए. पी. कुलकर्णी म्हणाले, "नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी हे नवीन कुलगुरूंसमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. कोरोनामुळे मागील दोन-तीन शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले आहेत. त्यात विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये असलेली कमी कर्मचाऱ्यांची संख्या अशा परिस्थितीत शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम तयार करून घेणे, त्यासाठी आवश्यक असणारी तयारी अशा अडचणी नवीन कुलगुरूंसमोर असणार आहेत. शिवाय विद्यापीठातील अभ्यास मंडळावर झालेल्या बेकायदेशीर नियुक्त्या हा गहन प्रश्न आहे. या नियुक्त्या रद्द करून नवीन अभ्यास मंडळ स्थापन करून त्या नंतर अकॅडमिक कौन्सिल स्थापन केल्यानंतरच नवीन अभ्यासक्रम आणि पुढच्या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत." 

राज्य आणि विद्यापीठातील  बऱ्याच महाविद्यालयांकडे नॅक ची मान्यता नसल्यामुळे या महाविद्यालयांचे अनुदान बंद होऊ शकते. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या टाळायच्या असतील तर या महाविद्यालयांशी चर्चा करून त्यांना नॅक ची मान्यता मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणेही गरजेचे आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. संशोधनात्मक आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर देणे, देशात आणि जगात विद्यापीठाची क्रमवारी वाढवणे, अशी अनेक आव्हाने नवीन कुलगुरूंसमोर असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo