निकालाच्या भीतीने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत पास झाला मात्र जीव गेला

“मी नापास होईन” या एकाच विचाराने तो ग्रासला होता. या तणावातून त्याने निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली.

निकालाच्या भीतीने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत पास झाला मात्र जीव गेला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मधील इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल (10th Grade Exam Results) नुकताच जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, निकालाच्या उत्साहात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. निकाल लागण्यापूर्वीच परीक्षेच्या दडपणाने एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या (Student suicide) केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar Crime News) घडली आहे. मात्र, या परीक्षेत तो पास (Passed the exam) झाला असून विद्यार्थी भीतीमुळे जिवानीशी गेली.  

पुंडलिकनगर परिसरातील रहिवासी सोहम मोरे (वय १६) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. निकालाच्या भीतीने तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. “मी नापास होईन” या एकाच विचाराने तो ग्रासला होता. या तणावातून त्याने निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. सोहमने आत्महत्या करण्यापूर्वी आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केले होते आणि तो कमालीचा शांत झाला होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली.

सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, ज्या निकालाच्या भीतीपोटी सोहमने जीव दिला, त्याच निकालात तो उत्तीर्ण झाला होता. त्याला ४२ टक्के गुण मिळाले असून तो पास झाल्याचे निकालात स्पष्ट झाले. या बातमीने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “थोडा धीर धरला असता तर आज तो आमच्यात असता,” अशी व्यथित भावना त्याच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, दहावीच्या निकालाच्या काळात विद्यार्थ्यांवर येणारे मानसिक दडपण आणि पालक-शिक्षकांकडून अपेक्षित यशाचा भार हे आत्महत्येचे प्रमुख कारण ठरत आहे. यंदाही निकालाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना तणावाचा सामना करावा लागला. शिक्षण मंडळ आणि शाळांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सोहमसारख्या घटनांमुळे पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी खुल्या मनाने संवाद साधणे आणि त्यांच्या भीती-दडपणाला गांभीर्याने समजून घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. निकाल हा केवळ यश-अपयशाचा निकष नसून, विद्यार्थ्यांच्या भावनिक स्वास्थ्याला प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे.