10th Result : हाल सोसते मराठी! मराठी विषयात मोठी घसरण; ९४ हजारांवर विद्यार्थी नापास

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नापास झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८० हजार ८०३ विद्यार्थी हे प्रथम भाषा म्हणून मराठी विषय घेतलेले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ही अवस्था भाषेच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.

10th Result : हाल सोसते मराठी! मराठी विषयात मोठी घसरण; ९४ हजारांवर विद्यार्थी नापास

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल (10th Grade Results) जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के (92.09 percent result) लागला आहे. यात एकूण १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल समाधानकारक असला तरी मराठी विषयातील निकालाची घसरण (Decline in Results) पाहता चिंता वाढवली आहे. या निकालानुसार, यंदा दहावीच्या परीक्षेत तब्बल ९४ हजार ५४४ विद्यार्थी आपल्या मायबोली मराठी विषयात नापास (Failed in Marathi subject) झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे आपुल्याच घरात हाल सोसते मराठी, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

मराठीचा निकाल केवळ ९२ टक्के लागला असल्याने परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८ टक्के विद्यार्थी आपल्या मातृभाषेतच पास होऊ शकले नाहीत. यातील बहुसंख्य विद्यार्थी काठावर पास झाले असल्याचेही समोर आले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नापास झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८० हजार ८०३ विद्यार्थी हे प्रथम भाषा म्हणून मराठी विषय घेतलेले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ही अवस्था भाषेच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.

शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, मराठीतील ही घसरण अनेक कारणांमुळे होत आहे. कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढल्याने विद्यार्थी आणि पालकांचा कल इंग्रजीकडे वाढला आहे. परिणामी मराठीचा वापर केवळ घरात आणि बोलण्यापुरता मर्यादित राहिला आहे. व्याकरणातील हस्व-दीर्घ, शुद्धलेखन आणि नियमांची अज्ञानता यामुळे लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गुण कापले जात आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात अवांतर वाचनाची सवय लोप पावल्याने विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रहही घटला आहे.

बारावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतरही प्रत्यक्ष निकालात मराठीची पीछेहाट सुरूच असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. केवळ सक्तीचे कायदे पुरेसे नसून, शाळांमधील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. पाठांतरावर भर देण्याऐवजी भाषेचे उपयोजन, व्यावहारिक वापर आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठीबद्दल प्रेम निर्माण करण्यावर शिक्षकांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.मराठी ही आपली मातृभाषा आणि सांस्कृतिक ओळख आहे. तिच्या संवर्धनासाठी शैक्षणिक धोरणे, शिक्षक प्रशिक्षण आणि पालक-विद्यार्थी जागृती यांची सातत्याने गरज आहे. अन्यथा भविष्यात मराठीची घसरण अधिक गंभीर स्वरूप घेऊ शकते.