दहावीच्या निकालाचा रात्रीस खेळ चाले; बोर्डाने अनेक विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून

पुणे विभागीय मंडळाकडून माहिती घेतली असता तब्बल 117 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल त्यांना ऑफलाइन पद्धतीने सांगावा लागला. तसेच पुणे विभागीय मंडळाचे निकालाचे काम पूर्ण झालेले नसताना राज्य मंडळांने निकाल जाहीर करण्याची घाई केली असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

दहावीच्या निकालाचा रात्रीस खेळ चाले; बोर्डाने अनेक विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीचा निकाल आठ मे रोजी जाहीर करण्यात आला मात्र अनेक विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला गेला. विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना या विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता आला नाही. शेवटी विभागीय मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधून विद्यार्थी व पालकांना निकाल न मिळाल्याबाबत तक्रार करावी लागली. त्यानंतर रात्री तब्बल 12 वाजेपर्यंत विभागीय मंडळातील कर्मचाऱ्यांना संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल ऑफलाइन पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागला. त्यामुळे दहावीच्या निकालासाठी 'रात्रीस खेळ चाले' असे काहीसे चित्र निर्माण झाले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत, याची खातरजमा केल्यानंतरच आत्तापर्यंत राज्य मंडळाकडून निकाल जाहीर केला जात होता. परंतु, यंदा निकाल जाहीर करण्याची घाई करण्यात आली. शेकडो विद्यार्थ्यांच्या निकालाचे कामकाज अपूर्ण असताना यापूर्वी जाहीर झालेल्या निकालाच्या तुलनेत यंदा लवकर निकाल जाहीर केला , केवळ हे दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निकाल जाहीर केला.

दरम्यान,आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल त्यांना ऑनलाईन पद्धतीने मिळाला, परंतु माझाच निकाल ऑनलाईन का दिसत नाही? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडला. पुणे विभागातील जेजुरी येथील एका विद्यार्थिनीला ऑनलाईन निकाल उपलब्ध झाला नाही. त्यावर एज्युवार्ताने याबाबत पुणे विभागीय मंडळाकडून माहिती घेतली असता तब्बल 117 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल त्यांना ऑफलाइन पद्धतीने सांगावा लागला. तसेच पुणे विभागीय मंडळाचे निकालाचे काम पूर्ण झालेले नसताना राज्य मंडळांने निकाल जाहीर करण्याची घाई केली असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

पुणे विभागीय मंडळातील कर्मचाऱ्यांना अनेक विद्यार्थी, पालक व मुख्याध्यापकांनी निकाल ऑनलाईन पद्धतीने दिसत नसल्याबाबत तक्रार केली. त्यानंतर या विद्यार्थ्यांचा निकाल पुणे विभागीय मंडळातील कर्मचाऱ्यांना मोबाईल वरून सांगावा लागला.तसेच व्हाट्सअप किंवा एसएमएस व ईमेलद्वारे पाठवावा लागला. निकाल ऑनलाईन दिसत नसल्याने आपण नापास झालो आहोत का? अशी भीती विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली होती. विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले असते तर त्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.अजूनही अनेक विद्यार्थ्यांचा निकाल राज्यमंडळाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिसत नाही. येत्या सोमवारी हा निकाल ऑनलाईन पद्धतीने दिसण्यासंदर्भातील कार्यवाही केली जाणार आहे, असेही अत्यंत विश्वनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, राज्य मंडळाकडे याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.