भुताच्या अफवेने मेळघाटातील आश्रमशाळा ओस पडली; ६०८ विद्यार्थ्यांनी शाळा सोडली
शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणा आणि आरोग्य यंत्रणेच्या अस्पष्ट भूमिकेमुळे पालकांचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. भीतीपोटी पालकांनी आपल्या मुला-मुलींना आश्रमशाळेतून घरी परत नेण्यास सुरुवात केली आणि अखेर सर्व विद्यार्थी शाळा सोडून निघून गेले. यामुळे आश्रमशाळा पूर्णपणे ओस पडली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मेळघाटातील चिखलदरा तालुक्याच्या (Melghat Chikhaldara Taluka) डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेत (Doma Government Residential Ashram School) भुताटकीची अफवा (Rumor of a ghost) पसरल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी पटसंख्येवरील सर्व ६०८ (608 students) विद्यार्थी शाळा सोडून घरी निघून गेले. या आश्रमशाळेत २६३ मुले आणि ३४५ मुली (263 boys and 345 girls) निवासी शिक्षण घेत होत्या. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीमध्ये अकारण रडणे, मोठ्याने हसणे, अचानक ओरडणे, शांत बसून राहणे आणि कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद न देणे अशी विचित्र लक्षणे दिसू लागली. पाहता पाहता हीच लक्षणे इतर मुलींमध्येही वेगाने पसरली.
या घटनेची माहिती मिळताच अमरावतीहून विशेष समुपदेशन पथक पाचारण करण्यात आले. मात्र आरोग्य यंत्रणेला या विचित्र वर्तनामागील मूळ कारण शोधता आले नाही. काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकित राठोड यांच्या मते, हा प्रकार ‘मास हिस्टेरिया’ म्हणजेच तीव्र मानसिक तणावाशी संबंधित असण्याची शक्यता आहे. तरीही भुताटकीची अफवा वेगाने पसरली आणि पालकांमध्ये भीती निर्माण झाली.

शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणा आणि आरोग्य यंत्रणेच्या अस्पष्ट भूमिकेमुळे पालकांचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. भीतीपोटी पालकांनी आपल्या मुला-मुलींना आश्रमशाळेतून घरी परत नेण्यास सुरुवात केली आणि अखेर सर्व विद्यार्थी शाळा सोडून निघून गेले. यामुळे आश्रमशाळा पूर्णपणे ओस पडली आहे.
या संपूर्ण प्रकरणात सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे आश्रमशाळेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापक आणि अधीक्षकांचे मौन. एकामागून एक गंभीर घटना घडत असताना आणि मुले शाळा सोडून जात असतानाही जबाबदार अधिकारी गप्प राहिले. यामुळे प्रशासकीय हलगर्जीपणा किंवा अन्य गंभीर कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आता केवळ अफवांवर नियंत्रण मिळवून भागणार नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी मुख्याध्यापक व अधीक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मेळघाटातील या आश्रमशाळेतील घटना स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.