पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेजवर विद्यापीठाची मोठी कारवाई; रात्रीच्या अंधारात विद्यार्थ्यांनी लिहिला पेपर
कॉलेजचे परीक्षा केंद्र दहा वर्षासाठी बंद, तीन लाख रुपये आणि कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 3 वर्षे परीक्षेच्या कामावर निर्बंध घालण्याची कारवाई प्रस्तावित केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
रात्रीच्या अंधारात नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी दिल्या प्रकरणी पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगवर (Parvatibai Genba Moze College of Engineering, Wagholi)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University)मोठी कारवाई प्रस्तावित केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यात कॉलेजचे परीक्षा केंद्र दहा वर्षासाठी बंद, तीन लाख रुपये आणि कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 3 वर्षे परीक्षेच्या कामावर निर्बंध घालण्याची कारवाई प्रस्तावित केली आहे. त्यासंदर्भातील अहवाल विद्यापीठाकडे सादर करण्यात आला आहे, असेही खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.विद्यापीठ प्रशासनाने यावर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही.
मोझे कॉलेजमधील गैरप्रकार:डॉ. देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा माझे या महाविद्यालयातील प्राध्यापकाने व त्याच्या साथीदारांनी पैसे कमवण्यासाठी परीक्षा झालेल्या उत्तरपत्रिका स्ट्रॉंग रूम मधून काढून रात्री पुन्हा विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी दिल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर विद्यापीठाने तात्काळ या संदर्भात सत्यशोधन समिती स्थापन केली होती.तसेच समितीला तातडीने काम करून सात दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात अधिष्ठाता डॉ.प्रमोद पाटील यांच्यासह प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे, प्राचार्य डॉ.सुनीता आढाव आणि समीर भोसले यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता.समितीने प्रत्यक्ष कॉलेजला भेट देवून सर्व चौकशी केली.त्यानंतर विद्यापीठाला काही दिवसांपूर्वी अहवाल सादर केला आहे.
विद्यापीठाकडे अहवाल सादर झाला असला तरी त्यावर विद्यापीठाच्या अधिकार मंडळासमोर या अहवालावर चर्चा करावी लागणार आहे.त्यानंतरच मोझे कॉलेजवर कारवाईची अंमलबजावणी केली जाणार आहे.मात्र,केवळ परीक्षेबाबत कारवाई केल्याने महाविद्यालयांच्या कामकाजात सुधारणा होणार नाही तर संबंधित कॉलेजमध्ये पूर्णवेळ प्राचार्य व मान्यतापात्र प्राध्यापक यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.त्यादृष्टीने विद्यापीठ काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.