शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे वादग्रस्त गाण्यावर नृत्य; पोलिसांनी घेतली दखल
आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात आदिवासी भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्या तरी एका गीतावर नृत्य बसवण्याचे ठरवले. त्यात केवळ अनावधानाने हे वादग्रस्त नृत्य निवडले गेले. मात्र, या गीतावरील सादर केलेल्या नृत्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या गाण्यात कथितपणे माओवादी कमांडर मदवी हिडमा याचे गौरवगान करण्यात आल्याचा आरोप आहे. हिडमा याचा १८ नोव्हेंबर २०२५ रोजी आंध्र प्रदेश येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्यातील विश्रांतवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांच्या वसतिगृहात आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वादग्रस्त गाण्यावर नृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांनी यांची दखल घेतली असून समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुध्दा या प्रकाराची दखल घेत संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी केली. त्यात केवळ अनावधानाने हे गाणे नृत्यांसाठी निवडले गेले. त्यामागे कोणताही ठरावीक उद्देश नव्हता,अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात आदिवासी भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्या तरी एका गीतावर नृत्य बसवण्याचे ठरवले. त्यात केवळ अनावधानाने हे वादग्रस्त नृत्य निवडले गेले. मात्र, या गीतावरील सादर केलेल्या नृत्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या गाण्यात कथितपणे माओवादी कमांडर मदवी हिडमा याचे गौरवगान करण्यात आल्याचा आरोप आहे. हिडमा याचा १८ नोव्हेंबर २०२५ रोजी आंध्र प्रदेश येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता.त्यांच्या संदर्भातील बोल या गीतामध्ये आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी पोलिसांनी वसतिगृहाला भेट देऊन संबंधित विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली आहे . तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, ६ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त वसतिगृहात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यानच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.मात्र, त्यात विद्यार्थ्यांचे कोणताही विशिष्ट उद्देश नसल्याचे समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.