तिसऱ्या भाषेत अनुत्तीर्ण झाल्यास १० वी चे प्रमाणपत्र मिळणार नाही; बोर्डाकडून नवीन नियमावली जाहीर
आगामी काळात इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार नाही. मात्र, शालेय स्तरावरील अंतर्गत मूल्यमापनात तिसऱ्या भाषेत उत्तीर्ण होणे मात्र अनिवार्य राहणार आहे. अन्यथा बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) त्रिभाषा सूत्राबाबत (Tribhasha Sutra) निर्माण झालेल्या गोंधळानंतर महत्वपूर्ण स्पष्टीकरण जारी केले आहे. आगामी काळात इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेत (10th Standard Board Exams) विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार नाही. मात्र, शालेय स्तरावरील अंतर्गत मूल्यमापनात तिसऱ्या भाषेत उत्तीर्ण होणे मात्र अनिवार्य (Passing in the third language is mandatory) राहणार आहे. अन्यथा बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र दिले जाणार (The 10th-grade passing certificate will not be issued) नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात वारंवार उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नावर बोर्डाकडून विद्यार्थी, पालक आणि शाळांना स्पष्टता दिली आहे.
इयत्ता ९ वीमध्ये तिसऱ्या भाषेचे मूल्यमापन पूर्णपणे अंतर्गत स्वरूपात शाळेतील शिक्षकांमार्फत होईल. जेव्हा ही तुकडी इयत्ता १० वीमध्ये प्रवेश करेल (शैक्षणिक वर्ष २०२७-२८), तेव्हा तिसऱ्या भाषेसाठी बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. तरीही १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना या विषयात उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. बोर्डाने याबाबतची नियमावली स्पष्ट केली आहे.
जर एखादा विद्यार्थी ९ वीमध्ये तिसऱ्या भाषेत अनुत्तीर्ण झाला, तर त्याला तात्पुरते १० वी वर्गात प्रवेश दिला जाईल. मात्र १० वीमध्ये अभ्यास करत असताना त्याला ९ वीच्या तिसऱ्या भाषेची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. १० वीमध्येही अनुत्तीर्ण राहिल्यास मुख्य निकाल जाहीर होण्यापूर्वी शाळा स्तरावर पुनर्परीक्षा घेण्यात येईल आणि त्यात उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्याला पास घोषित करण्यात येईल.
सध्या ७ वी आणि ८ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तीन भाषांचा अभ्यास करावा लागेल, ज्यात दोन भारतीय भाषा अनिवार्य आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी दोन परदेशी भाषा निवडल्या आहेत, त्यांना तिसरी भाषा म्हणून एक भारतीय भाषा घ्यावी लागेल. या सर्व विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा नसली तरी शालेय मूल्यमापन अनिवार्य राहील.
दुसरीकडे, सध्या ६ वीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या तुकडीसाठी दोन भारतीय भाषा सक्तीच्या राहतील. ही तुकडी जेव्हा इयत्ता १० वीपर्यंत पोहोचेल, तेव्हा तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक असेल. सीबीएसईने केलेल्या या स्पष्टीकरणामुळे विद्यार्थी आणि शाळांना मोठा दिलासा मिळाला आहे.