मोठा निर्णय! एमपीएससी परीक्षेत अपयश आल्यावर पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही

एका विभागातील नोकरीसाठी परीक्षा दिल्यानंतर, जर उमेदवार तिथे निवडला गेला नाही किंवा दुसऱ्या विभागातील समकक्ष पद रिक्त असेल, तर पुन्हा परीक्षा न घेता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाईल.

मोठा निर्णय! एमपीएससी परीक्षेत अपयश आल्यावर पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगा अर्थात यूपीएससीच्या (UPSC) 'प्रतिभा सेतू'च्या (Pratibha Setu) धर्तीवर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीसाठी (MPSC) 'निपुण सेतू' योजना (Nipun Setu scheme) सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे परीक्षार्थ्यांचा वेळ, पैसा वाचणा असून भरती प्रक्रियेत सहजता आणि सुसूत्रता येणार आहे.

यापूर्वी एमपीएससीमार्फत केवळ ५३ संवर्गांसाठी परीक्षा घेतली जात होती. आता राज्य सरकारने ही व्याप्ती वाढवून १०३ संवर्ग तयार केले आहेत. या निर्णयानुसार, एका विभागातील नोकरीसाठी परीक्षा दिल्यानंतर, जर उमेदवार तिथे निवडला गेला नाही किंवा दुसऱ्या विभागातील समकक्ष पद रिक्त असेल, तर पुन्हा परीक्षा न घेता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाईल.

या निर्णयाचे वेगळेपण म्हणजे एमपीएससीच्या गुणांच्या आधारे आता खाजगी कंपन्यांनाही गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड करता येणार आहे. यामुळे सरकारी नोकरी हुकली तरी कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा निष्कर्ष राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्यानंतर काढला. दरम्यान, शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे प्रशासकीय कामात वेग येईल आणि रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अधिक गतीने पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे
___________________________________________

"महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती होणाऱ्या संवर्गांची संख्या वाढवण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतला आहे. यापूर्वी ५३ संवर्गांची भरती आयोगामार्फत व्हायची. सरकारने अतिरिक्त १०० संवर्गांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे १५३ संवर्गांची भरती होईल. सरळसेवा संवर्गातील गट 'क' च्या सर्व परीक्षा एमपीएससी  मार्फत घेण्यात याव्यात, यासाठी आम्ही अनेक वर्ष झाल् पाठपुरावा करत होतो, आज कुठे तरी त्याला यश येताना दिसत आहे, याचा आनंद आहे."   

- महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा  विद्यार्थी असोसिएशन