बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम व बीएचएमसीटी सीईटीचा निकाल जाहीर; ५ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल
बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि बीएचएमसीटी सीईटीमध्ये ठाणे येथील अर्जुन ब्रीद, पुणे येथील वेदांत राजेश इबहाद, सोलापूर येथील खिलती हेमल शहा, रायगड येथील ओजस उदय पोवार आणि राजस्थानमधील जयपूर येथील निकेत खत्री यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी घेण्यात आलेल्या बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस आणि बीएचएमसीटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण पाच विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवत यश संपादन केले आहे.
सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये निकाल उपलब्ध करून दिला असून संबंधित अभ्यासक्रमांची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि बीएचएमसीटी सीईटीमध्ये ठाणे येथील अर्जुन ब्रीद, पुणे येथील वेदांत राजेश इबहाद, सोलापूर येथील खिलती हेमल शहा, रायगड येथील ओजस उदय पोवार आणि राजस्थानमधील जयपूर येथील निकेत खत्री यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.या पाच गुणवंतांमध्ये चार विद्यार्थी महाराष्ट्रातील असून एक विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरील आहे.
खुल्या प्रवर्गात अर्जुन ब्रीद (ठाणे), खिलती हेमल शहा (सोलापूर) आणि ओजस उदय पोवार (रायगड) यांनी १०० पर्सेंटाईल मिळवून अव्वल स्थान पटकावले. ओबीसी प्रवर्गात वेदांत राजेश इबहाद (पुणे) यांनी १०० पर्सेंटाईल मिळवले.
एससी प्रवर्गात मुद्रा विजय वाघमारे (मुंबई उपनगर) यांनी ९९.८८ पर्सेंटाईल, एसटी प्रवर्गात सुश्रुत जयंत पहुलकर (नाशिक) यांनी ९९.९७ पर्सेंटाईल, तर एनटी-२ सी प्रवर्गात रश्मिता महेंद्र मडके (ठाणे) यांनी ९९.८५ पर्सेंटाईल गुण मिळवले.
एसबीसी प्रवर्गात अनिका भूषण मुसळे (पुणे) यांनी ९९.९२ पर्सेंटाईल, तर एसइबीसी प्रवर्गात ज्ञानराज दिलीप पवार (नांदेड) यांनी ९९.०८ पर्सेंटाईल गुण मिळवले. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांमध्ये राजस्थानमधील निकेत खत्री यांनी १०० पर्सेंटाईल मिळवत अव्वल स्थान मिळवले.

सीईटी कक्षातर्फे प्रवेश परीक्षा २८ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी चार सत्रांमध्ये संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण ७१ हजार ६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ३२ हजार ८५१ विद्यार्थी आणि २९ हजार ४४९ विद्यार्थिनींचा समावेश असून एकूण उपस्थिती ८७.६६ टक्के नोंदविण्यात आली.
परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५९ हजार ८२० विद्यार्थी महाराष्ट्रातील तर २ हजार ४८० विद्यार्थी इतर राज्यांतील होते. राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील १२३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. यावर्षी महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली नव्हती.
प्रवेश प्रक्रिया लवकरच
निकाल जाहीर झाल्यानंतर आता बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस आणि बीएचएमसीटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) लवकरच सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.