प्राध्यापकाला शिकवताच येत नाही अन् शिकवलेच तर समजत नाही; कुलगुरूंसमोर विद्यार्थ्यांच्या व्यथा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे अध्यापनाचा दर्जा, भाषेतील अडथळे आणि मूलभूत सुविधांबाबत चिंता व्यक्त केली.

प्राध्यापकाला शिकवताच येत नाही अन् शिकवलेच तर समजत नाही; कुलगुरूंसमोर विद्यार्थ्यांच्या व्यथा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी गेल्या वीस दिवसांपासून विविध विभागांत जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत. हा संवाद केवळ कुलगुरू आणि विद्यार्थ्यांपुरता मर्यादित असून विभागातील प्राध्यापक त्यावेळी उपस्थित नसतात. अलीकडेच वाणिज्य विभागात पोहोचलेल्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने समस्या सांगण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एम कॉम वर्गातील शिकवणुकीबाबत गंभीर तक्रारी मांडल्या. दोन प्राध्यापकांची नावे घेऊन त्यांनी सांगितले की वर्गात शिकवलेले काहीच समजत नाही आणि प्रश्न विचारले तरी पुन्हा स्पष्टीकरण दिले जात नाही, अशा व्यथा मांडल्या. 

परदेशी विद्यार्थ्यांनीही भाषाविषयक अडचण व्यक्त केली. अभ्यासक्रमातील अनेक बाबी केवळ मराठीत सांगितल्या जातात, त्यामुळे समजण्यास अडथळा येतो, असे त्यांनी सांगितले. किमान हिंदीत तरी शिकवले जावे, कारण हिंदी थोडीफार समजते, अशी मागणी त्यांनी केली. मात्र संबंधित प्राध्यापकांना हिंदीत शिकवता येत नसल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. याशिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार झालेल्या अभ्यासक्रमात प्रथम आणि द्वितीय वर्षातील अनिवार्य व ऐच्छिक विषय कोणते आहेत, याबाबतही स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. ही माहिती सांगितली जात नाही, असे त्यांनी कुलगुरूंना सांगितले.

विद्यार्थ्यांनी उपाहारगृहाच्या समस्येकडेही लक्ष वेधले. विद्यापीठात सध्या एकच उपाहारगृह सुरू असून तेथे दिले जाणारे खाद्य गुणवत्तापूर्ण नाही, अशी तक्रार आहे. जेवणाबरोबर नाश्त्याची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक वाहनांच्या सुविधेबाबत समाधान व्यक्त केले. विद्यापीठाने सुरू केलेल्या या वाहनांचा मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. फुलारी यांच्या थेट संवादाने विद्यार्थ्यांना आपल्या अडचणी मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली. शिकवणुकीची गुणवत्ता, भाषा आणि मूलभूत सुविधा याबाबतच्या तक्रारींवर लवकरच उपाययोजना होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांत सुरू असलेल्या या संवाद मोहिमेमुळे विद्यार्थी-प्रशासन संबंध अधिक पारदर्शक होत असल्याचे दिसून येत आहे.