उच्चस्तरीय समिती १२ सप्टेंबरला पुणे विद्यापीठात; विद्यार्थ्यांना भरती परीक्षांतील अडचणी मांडण्याची नामी संधी

महाराष्ट्र सरकारच्या परीक्षांसाठी अधिक भक्कम सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. कारण एका उच्च-स्तरीय समितीने प्रश्नपत्रिका फुटणे, बनावट उमेदवार परीक्षेतील पारदर्शकता यांबाबत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय मागवला आहे.

उच्चस्तरीय समिती १२ सप्टेंबरला पुणे विद्यापीठात; विद्यार्थ्यांना भरती परीक्षांतील अडचणी मांडण्याची नामी संधी
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
महाराष्ट्रातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती थेट विद्यार्थी आणि उमेदवारांशी संवाद साधणार आहे. अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचे बैठक १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे. येथे परीक्षार्थी आपल्या अडचणी, त्रुटी आणि सूचना थेट मांडू शकतील. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
समितीचा उद्देश डमी उमेदवार, पेपरफुटी आणि इतर गैरप्रकार रोखणे तसेच परीक्षा पद्धतीला उमेदवाराभिमुख करणे हा आहे. राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्ग आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून अभिप्राय घेतले जात आहेत. विद्यमान परीक्षा प्रणाली, विविध विभाग आणि प्राधिकरणांच्या कार्यपद्धतीबाबत सूचना मागवल्या जात आहेत. प्रश्नपत्रिका तयार करणे, मॉडरेशन, वितरण, गोपनीय वाहतूक, केंद्र व्यवस्थापन, मूल्यांकन आणि निकाल प्रक्रिया यांचा आढावा घेतला जाईल.
डिजिटल प्रणाली, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स आणि सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबाबतही अभिप्राय अपेक्षित आहेत. प्रश्नपत्रिका फुटणे, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय व उत्तरदायित्व निश्चित करण्याबाबत सूचना विचारात घेतल्या जातील. इतर राज्ये आणि देशांतील यशस्वी पद्धतींचा अभ्यास, पायाभूत सुविधा मानके, यंत्रणांमधील समन्वय आणि जलद तक्रार निवारण व्यवस्था याबाबतही सूचना मागवल्या जात आहेत.
पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी आणि संबंधित घटकांना सूचना, शिफारसी, हरकती व निवेदने सादर करण्यासाठी ७ ते १० सप्टेंबर या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षाची व्यवस्था केली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत कक्षामध्ये थेट सादर करता येईल. तसेच examcollectorpune@gmail.com या ईमेलवरही पाठवता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व सूचना संकलित करून उच्चस्तरीय समितीकडे पाठवल्या जातील.
समिती या सर्व अभिप्रायांचा सखोल अभ्यास करून राज्य शासनास सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करेल. यामुळे भविष्यातील भरती परीक्षा अधिक निष्पक्ष, सुरक्षित आणि उमेदवारांसाठी सोयीस्कर होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील संबंधित सर्वांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या सूचना वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.