धम्मदीक्षेच्या ऐतिहासिक वारशाचा दुर्मिळ दस्तऐवज खंड दसऱ्याला प्रकाशित होणार; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मदीक्षा हा केवळ धार्मिक परिवर्तनाचा प्रसंग नसून भारतीय समाजजीवनात समता, स्वाभिमान, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना नवे अधिष्ठान देणारा ऐतिहासिक टप्पा मानला जातो.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे घेतलेल्या ऐतिहासिक बौद्ध धम्मदीक्षेच्या स्मृती आणि वारसा दस्तऐवजी स्वरूपात जतन करणारा दुर्मिळ व महत्त्वपूर्ण खंड लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. या खंडामध्ये धम्मदीक्षेशी संबंधित दुर्मिळ पत्रव्यवहार, महत्त्वपूर्ण कागदपत्रे, निवेदने, संदर्भसाहित्य तसेच विविध ऐतिहासिक दस्तऐवजांचा समावेश करण्यात येणार आहे. हा खंड २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसऱ्याच्या दिवशी प्रकाशित करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
यासंदर्भात मंत्रालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे तसेच समितीचे सदस्य सचिव आणि सदस्य उपस्थित होते.
बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीशी संबंधित उपलब्ध दुर्मिळ पत्रव्यवहार, कागदपत्रे आणि अन्य संदर्भसाहित्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने शोध, संकलन, वर्गीकरण आणि जतन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मदीक्षा हा केवळ धार्मिक परिवर्तनाचा प्रसंग नसून भारतीय समाजजीवनात समता, स्वाभिमान, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना नवे अधिष्ठान देणारा ऐतिहासिक टप्पा मानला जातो. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेशी संबंधित मूळ पुरावे, पत्रव्यवहार आणि दस्तऐवज भावी पिढ्यांसाठी तसेच संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
नागपूर येथील ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याशी संबंधित त्या काळातील सामाजिक वातावरण, सोहळ्याचे नियोजन, पत्रव्यवहार आणि तत्कालीन विचारप्रवाह याबाबतचे महत्त्वपूर्ण संदर्भ या खंडाच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.
खंडाच्या निर्मितीचे काम अधिक वेगाने पूर्ण करून संपादन, संकलन, मुद्रण आणि प्रकाशनाची प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. दस्तऐवजांचे दर्जेदार संपादन करताना त्यांची सत्यता, संदर्भमूल्य आणि ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहील, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा हा अमूल्य दस्तऐवजी ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.