शिक्षण आणि उद्योगविश्वातील दिग्गज एका मंचावर
महिलांना शिक्षण घेण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यांची क्षमता केवळ घरापुरती मर्यादित राहता कामा नये. महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन आणि लवचिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षण क्षेत्राने उद्योगविश्वाचा सन्मान करावा आणि उद्योगविश्वाने शैक्षणिक क्षेत्राचा गौरव करावा, या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्स २०२६’च्या चौथ्या पर्वाचा दिमाखदार समारोप शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी पुण्यातील सनीज वर्ल्ड येथे झाला. या सोहळ्यात शिक्षण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रत्येकी १५ अशा एकूण ३० मान्यवरांचा त्यांच्या नेतृत्वगुणांसह नावीन्यपूर्ण उपक्रम आणि सक्षम मनुष्यबळ निर्मितीतील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
पुण्यातील मनुष्यबळ व प्रतिभा व्यवस्थापन क्षेत्रातील जॉबिझ्झा संस्थेने संस्थापक डॉ. गौरव शर्मा यांच्या पुढाकारातून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला शिक्षण, उद्योग, प्रशासन तसेच विविध क्षेत्रांतील ६०० हून अधिक मान्यवर उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मुलाखत-तयारी मंच ‘pass98’चे प्रमुख प्रायोजकत्व, तर यवतमाळ येथील जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसामान्यांना परवडणारे असण्याची गरज अधोरेखित केली. महिला सक्षमीकरणासोबतच उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील समन्वयावरही त्यांनी भर दिला.
महिलांना शिक्षण घेण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यांची क्षमता केवळ घरापुरती मर्यादित राहता कामा नये. महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन आणि लवचिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज आहे. रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था आणि महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भरती करणारे उद्योगविश्व यांच्यातील समन्वयातूनच देशाच्या भविष्यातील क्षमता पूर्णपणे साकार होतील, असे पाटील यांनी सांगितले.
यानंतर झालेल्या उच्चस्तरीय परिसंवादात शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योगांच्या अपेक्षा यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी उद्योगक्षेत्राच्या सक्रिय सहभागाशिवाय अर्थपूर्ण प्रतिभाविकास आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर शक्य नसल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष जगातील कौशल्ये विकसित करण्यासाठी उद्योगांनी शैक्षणिक संस्थांसोबत सक्रियपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सोमैया विद्याविहार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई यांनी शिक्षणव्यवस्थेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. सक्षम आणि आधुनिक कौशल्यांनी सुसज्ज शिक्षकांची देशाला मोठ्या प्रमाणावर गरज असून, शिक्षकांना सक्षम करण्यासाठी गुंतवणूक करणे म्हणजे भारताच्या भविष्यात गुंतवणूक करण्यासारखे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पीसीएमसी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी शिक्षण आणि उद्योग क्षेत्राने एकत्र येऊन विद्यार्थी आणि रोजगार देणाऱ्या संस्थांसाठी परस्पर फायदेशीर व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या विद्यापीठाने अभ्यासक्रमाची आखणी आणि अध्यापन प्रक्रियेत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा थेट सहभाग ३० टक्क्यांपर्यंत वाढविल्याचे त्यांनी सांगितले.
या परिसंवादात शिक्षण तज्ज्ञ डॉ. बी. बी. आहुजा, डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, एनस्क्वेअर एक्सपर्ट्सचे मुख्य धोरण अधिकारी किरीट मांडवगणे आणि टाटा मोटर्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय वाधवा यांनीही विचार मांडले.
पारंपरिक पद्धतीने केवळ पदव्या देण्यापेक्षा उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष उद्योगाभिमुख कौशल्यविकासाची साखळी निर्माण करण्याची गरज या वेळी अधोरेखित करण्यात आली. विद्यार्थ्यांमधील कौशल्याची दरी भरून काढण्यासाठी तसेच संस्थात्मक पातळीवर नावीन्यपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी योगदान देणाऱ्या नेतृत्वाचा पुरस्काराद्वारे सन्मान करण्यात आला.
कुलगुरू, अधिष्ठाता, संचालक आणि प्राचार्य यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, संस्थापक, मनुष्यबळ विभागप्रमुख आणि वरिष्ठ व्यवस्थापनातील अधिकारी अशा शिक्षण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील एकूण ३० मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
‘महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्स’च्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट करताना जॉबिझ्झाचे संस्थापक डॉ. गौरव शर्मा यांनी सांगितले की, उद्योगविश्व रोजगारासाठी तयार उमेदवार मिळत नसल्याची तक्रार करते, तर शैक्षणिक संस्था योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याचे सांगतात. ही दरी दूर करून दोन्ही क्षेत्रांमध्ये संवादाचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विकसित भारताच्या संकल्पनेशी सुसंगत वाटचाल करताना विकसित महाराष्ट्र हा भारताच्या विकासाचे प्रमुख इंजिन ठरेल. शिक्षक आणि उद्योगक्षेत्रातील मार्गदर्शकांचा गौरव करणे म्हणजे जागतिक दर्जाची, शाश्वत आणि सक्षम प्रतिभाव्यवस्था उभारण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार असल्याचे डॉ. शर्मा यांनी नमूद केले.