कुलगुरू पदासाठी राजकीय वरदहस्त कशाला ?    

विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान होण्यासाठी काय करावे लागले, याबाबतची माहिती एका कुलगुरूंनी पत्रकारांबरोबर झालेल्या बैठकीत खाजगीमध्ये सांगितली होती.कोणत्या राजकीय व्यक्तीला भेटल्यामुळे माझा कुलगुरू पदाचा मार्ग सोपा झाला; याबाबतचा वृत्तांत त्यांनी कथन केला होता.

कुलगुरू पदासाठी राजकीय वरदहस्त कशाला ?    
Pune university main building

राहुल शिंदे 

विद्यापीठ  University ही एक स्वायत्त संस्था आहे.  शिक्षण आणि संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विद्यापीठाकडे पाहिले जाते. काही वर्षांपूर्वी राजकीय हस्तक्षेपापासून दूर असलेल्या विद्यापीठात आता कमी अधिक प्रमाणात का होईना राजकारणाचा शिरकाव झाला आहे. कुलगुरू (vice chancellor)  हे शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पद मानले जाते. पण कुलगुरू पदावर विराजमान होण्यासाठी सुद्धा राजकीय वरदहस्त (Political ascendancy) असावा लागतो, अशी चर्चा गेल्या काही वर्षांपासून शिक्षण वर्तुळात दबक्या आवाजात केली जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) कुलगुरू पदाच्या मुलाखती पुढील काही दिवसात होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ' राजकीय वरदहस्त आणि कुलगुरू निवड ' या विषयावरील चर्वितचर्वण सुरू झाले आहे.           
       सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीसाठी अर्ज केलेल्या २७ जणांची यादी कुलगुरू शोध समितीने प्रसिद्ध केली असून यात सध्या पुणे विद्यापीठात विविध पदांवर कार्यरत असलेल्या तब्बल ११ उमेदवारांचा समावेश आहे. परंतु, यातील उमेदवाराच्या गळ्यात कुलगुरू पदाची माळ पडणार की बाहेरील व्यक्ती विद्यापीठाच्या कुलगुरू पदी विराजमान होणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.तसेच या मधील उमेदवारांची केवळ गुणवत्तेच्या जोरावर निवड होते की राजकीय व्यक्ती या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करतात, हे कालांतराने समोर येईलच .
         सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी अनेकवेळा विद्यापीठातीलच प्राध्यापकांच्या खांद्यावर दिली गेल्याचे आढळून आले आहे.माजी कुलगुरू डॉ.राम ताकवले यांच्यासह विद्यापीठाचे पंधरावे कुलगुरू डॉ.अरुण निगवेकर हे विद्यापीठातीलच विभागात कार्यरत होते. यानंतर विद्यापीठातीलच प्राध्यापक डॉ.अशोक कोळस्कर हे कुलगुरू झाले. अलीकडच्या काळात केवळ प्रसिध्द अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव व डॉ.रघुनाथ शेवगावकर या विद्यापीठाबाहेरील दोन अभ्यासू व्यक्ती कुलगुरू म्हणून विद्यापीठाला लाभल्या. त्यानंतर पुन्हा विद्यापीठाच्याच विभागात कार्यरत असणाऱ्या डॉ. वासुदेव गाडे आणि त्यांनतर डॉ.नितीन करमळकर यांच्याकडे कुलगुरू पदाची जबाबदारी देण्यात आली.यावेळी विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील उमेदवार सुध्दा तितकेच तोलामोलाचे आहेत.हे ही विसरून चालणार नाही.  
         विद्यापीठाचे कुलगुरू पद हे निश्चितच गुणवत्तेच्या जोरावर मिळायला हवे .परंतु, गुणवत्तेबरोबरच राजकीय वरदहस्त असावा लागतो.त्याशिवाय कुलगुरू पदापर्यंत पोहोचत येत नाही,असे अलीकडच्या काळात उघडपणे बोलले जात आहे.विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान होण्यासाठी काय करावे लागले, याबाबतची माहिती एका कुलगुरूंनी पत्रकारांबरोबर झालेल्या बैठकीत खाजगीमध्ये सांगितली होती.कोणत्या राजकीय व्यक्तीला भेटल्यामुळे माझा कुलगुरू पदाचा मार्ग सोपा झाला; याबाबतचा वृत्तांत त्यांनी कथन केला होता.त्यामुळेच यावेळी सुध्दा काही उमेदवार राजकीय वजनाचा वापर करत असल्याची चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात रंगली आहे.परंतु,शैक्षणिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढल्यास त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.त्यामुळे कुलगुरू पदाच्या निवडीसह विद्यापीठाच्या कोणत्याच कामात राजकीय हस्तक्षेप नसावा,अशी अपेक्षा शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.  
-------------------------
   पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी अनेक नामवंत व्यक्तींची निवड झाली आहे.या यादीतील कोणता उमेदवार कुलगुरू पदासाठी खरा दावेदार आहे, याचे आडाखे अनेकांकडून बांधले जात आहेत.परंतु,सर्व उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर अंतिम पाच उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याशिवाय याबद्दल अंदाज बांधणे  घाईचे ठरले,असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले  जात आहे.

                                           पदाच्या मुलाखतीसाठी निवड झालेले विद्यापीठातील उमेदवार 
 पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्यासह विद्यापीठात कार्यरत असलेले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र  विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर ,मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.विजय खरे,माजी अधिष्ठाता अंजली कुरणे,रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अविनाश कुंभार ,भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संदेश जाडकर,अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सुरेश गोसावी ,गणित विभागातील प्रा. विलास खरात, बायोटेक्नॉलॉजी विभागाचे राजू गच्छे या विद्यापीठाशी संबंधित असणाऱ्या ११ जणांची आणि विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ.अशोक चव्हाण यांची कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी निवड झाली आहे.येत्या १८ व १९ मे रोजी मुंबई आयआयटी येथे सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.