क्वांटम कंप्यूटिंग व डीप टेकसाठी सक्षम परिसंस्था उभारणे काळाची गरज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार आवश्यक असून, त्यासाठी स्वतंत्र संस्था उभारण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत असून, या परिवर्तनाशी वेगाने जुळवून घेण्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था उभारणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित 'इंटरॅक्शन विथ स्टेकहोल्डर्स फॉर फॉर्मेशन ऑफ द ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब अँड फ्रंटियर टेक इन्स्टिट्यूट' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, २०२४ मध्ये क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेकचा जागतिक बाजार सुमारे २ ते ३ ट्रिलियन डॉलर इतका होता. पुढील पाच वर्षांत तो १६ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून, मानवी इतिहासातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानांपैकी हे एक आहे. त्यामुळे भारताने या परिवर्तनात सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या फ्रंटियर टेक्नॉलॉजी इंडेक्समध्ये भारताचा ३६ वा क्रमांक असला, तरी अपेक्षेपेक्षा अधिक प्रगती करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या विविध स्तरांवर सुरू असलेले प्रयत्न विखुरलेले असून त्यांचे संस्थात्मकीकरण केल्यास देशाच्या प्रगतीला अधिक गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सिलिकॉन तंत्रज्ञान आणि क्वांटम कंप्यूटिंग ही भविष्यात उद्योग-व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारी तंत्रज्ञाने असल्याचे सांगत त्यांनी मजबूत तांत्रिक परिसंस्था उभारण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) निधी, तांत्रिक क्षमता आणि कौशल्यांच्या मर्यादांमुळे या तंत्रज्ञानाचा पुरेसा लाभ घेता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी सर्वांसाठी उपलब्ध असलेले स्मार्ट प्लॅटफॉर्म, सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार आवश्यक असून, त्यासाठी स्वतंत्र संस्था उभारण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र सरकारच्या क्वांटम कंप्यूटिंगविषयक योजनांशी राज्यातील प्रयत्न सुसंगत राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'मित्रा' संस्थेच्या माध्यमातून स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि डीप टेक क्षेत्रासाठी धोरणात्मक चौकट तयार करण्याचे काम सुरू असून, पुढील दोन ते तीन वर्षांत किमान पाच हजार क्वांटम कंप्यूटिंग प्रशिक्षक तयार करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. नवीन सुविधा आणि डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक करण्यास शासन तयार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मुंबईत विकसित होत असलेल्या 'इनोव्हेशन सिटी' प्रकल्पासाठी टाटा समूहाच्या सहकार्याने आराखडा तयार करण्यात येत असून, फ्रंटियर टेक इन्स्टिट्यूट आणि इनोव्हेशन सिटी हे दोन्ही उपक्रम परस्परपूरक ठरतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी क्वांटम कंप्यूटिंग, डीप टेक, संशोधन, उद्योग आणि कौशल्य विकास या विषयांवरील संधी आणि आव्हानांवर सविस्तर चर्चा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्ष गुणे यांनी केले.