UPSC पेपर कधी फुटत नाही, मग NEET का? सुप्रिया सुळेंची शैक्षणिक पारदर्शकतेची मागणी
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचे सांगत त्यांनी राजकारण बाजूला ठेवून तरुणांना न्याय मिळवून देण्याची गरज व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता हा सध्याच्या काळातील सर्वात मोठा प्रश्न बनला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटी प्रकरणाने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण केला आहे. परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतरही विरोधक (NEET paper leak protest) सत्ताधाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या प्रकरणावरून सरकारला खडेबोल सुनावले आहे. UPSC परीक्षेचा पेपर कधीही फुटत नसताना NEET सारख्या परीक्षेचा पेपर वारंवार का फुटतो? (UPSC paper is not cracked, why is NEET cracked) असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. त्यांनी NEET प्रकरणाची पूर्ण पारदर्शक चौकशी व्हावी म्हणून SIT स्थापन करण्याची मागणी केली. “सर्व पक्षीय बैठक किंवा संयुक्त संसदीय समिती स्थापन करून या प्रकरणाचा सखोल अभ्यास व्हावा,” असेही त्यांनी म्हटले. UPSC सारख्या प्रतिष्ठित परीक्षेची तुलना करताना सुळे म्हणाल्या, “UPSC चा पेपर कधी फुटत नाही. मग NEET चा पेपर का फुटतो? जगात इतर देशांमध्ये परीक्षा होतात, तेथे असे घोटाळे होत नाहीत. आपल्याकडे मात्र वारंवार पेपरफुटीचे प्रकार घडत आहेत.
”शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायीकरणावरही सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली. “अनेक कोचिंग क्लासेस आता मोठ्या कंपन्या बनल्या आहेत. त्यांचे IPO येत आहेत. शिक्षण हे आता व्यवसाय बनले आहे. एवढा पैसा या क्षेत्रात आला आहे की, ते सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होत आहेत. हे धक्कादायक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचे सांगत त्यांनी राजकारण बाजूला ठेवून तरुणांना न्याय मिळवून देण्याची गरज व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता हा सध्याच्या काळातील सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. NEET सारख्या परीक्षांमधील अनियमितता विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरत असून, उत्तम भविष्य घडवण्याच्या त्यांच्या स्वप्नांना धक्का बसत आहे. संसद ही चर्चेची जागा असल्याने, राजकीय पक्षांनी एकत्र येऊन परीक्षा पद्धतीत मूलभूत सुधारणा करण्याची गरज सुप्रिया सुळे यांनी अधोरेखित केली आहे.