राज्यातील आश्रमशाळांचा दर्जा कसा सुधारणार; काय म्हणाले आदिवासी मंत्री..
आदिवासी आश्रमशाळा तसेच वसतिगृहामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. तसेच आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नियंत्रण समिती तयार करण्यात येणार असल्याची घोषणा आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची आहे. त्यामुळे शिक्षणाच्या सर्व सुविधा आश्रमशाळांच्या (Tribal Ashram School) माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आदिवासी आश्रमशाळा तसेच वसतिगृहामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. तसेच आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नियंत्रण समिती तयार (Establishment of a control committee) करण्यात येणार असल्याची घोषणा आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके (Dr. Ashok Uike) यांनी केली.
वनामती येथील सभागृहात आदिवासी विकास विभागातर्फे नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण तसेच यासाठी साहाय्य करणाऱ्या संस्थांचा गौरव समारंभ आदिवासी विकासमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ. अशोक उईके म्हणाले, आदिवासी विभागाअंतर्गत असलेल्या सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे शैक्षणिक साहित्य पुरविणे आवश्यक आहे. वसतिगृहामध्ये असलेल्या सोयी व सुविधा कशा वाढविता येईल, यासाठी प्रत्येक आश्रमशाळेसाठी नियंत्रण समिती तयार करण्यात यावी. ही समिती नियमित विद्यार्थ्यांसोबत संवाद साधेल तरच प्रत्येक आदिवासी मुलाला शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.