गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार्या शिक्षकांच्या शासन खंबीरपणे पाठीशी; शिक्षणमंत्र्याची ग्वाही
आजच्या डिजीटल युगात विद्यार्थी हे जास्त करुन मोबाईकडे वळत आहे त्यांची आपल्या मातीशी व संस्कृतीशी नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन देखील त्यांनी शिक्षकांना केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
जे शिक्षक समर्पित, प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा विचार करून उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षण (Quality education) देत आहेत, अशा शिक्षकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे (The government is firmly behind) उभे आहे, असे मत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Education Minister Dada Bhuse) यांनी व्यक्त केले. आजच्या डिजीटल युगात विद्यार्थी हे जास्त करुन मोबाईकडे वळत आहे त्यांची आपल्या मातीशी व संस्कृतीशी नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन देखील त्यांनी शिक्षकांना केले.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सातारा येथील सैनिकी शाळेत शालेय शिक्षण विभागाची कोल्हापूर आढावा बैठक घेतली. बैठकीला शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांच्यासह अनेक मान्यवर व सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे येथील मातीशी आणि संस्कृतीशी असलेले नाते जोपासण्यासाठी शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षणाची व्याप्ती वाढवावी, असे भुसे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांसाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते यामध्ये कोणी गंभीर आजाराचा विद्यार्थी आढळल्यास तालुका, जिल्हास्तरावर आरोग्य सुविधा द्याव्यात, या सुविधा उपलब्ध नसतील तर मुंबई येथे उपचारासाठी घेऊन यावे विद्यार्थ्याला बरा करून घरी सोडावे.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सीबीएसई मधील अभ्यासक्रमाचाही राज्य शासनाने समावेश केला आहे. जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये पट वाढविण्यासाठी गुढी पाडवा पट वाढवा, शाळेमध्ये देण्यात येणार्या सुविधांचे फलक असे विविध उपक्रम राबवित आहेत हे उपक्रम पुढील काळातही राबवित रहा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आवाहन शिक्षकांना केले.