बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 91.88 टक्के
दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारलीय आहे. मुलांचा निकाल 89.51 टक्के तर मुलींचा निकाल 94.58 टक्के लागला आहे. राज्यात निकालात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर असून लातूर विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (SSC, HSC Board) फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (12th Result) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारलीय आहे. मुलांचा निकाल 89.51 टक्के तर मुलींचा निकाल 94.58 टक्के लागला आहे. राज्यात निकालात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर असून लातूर विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फ राज्यातील सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मागील वर्षी 93.37 टक्के निकाल लागला होता. यंदा 91.88 टक्के निकाल लागला असल्याने निकालात 1.49 टक्के घट झाली आहे.
निकाल पाहाण्याचे अधिकृत संकेतस्थळे
- hscresult.mkcl.org
- mahahssboard.in
- Results.targerpublications.org
निकाल कसा पाहायचा?
सर्वप्रथम शिक्षण मंडळाकडून निकाल प्रसिद्ध केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जा. तिथे गेल्यावर "HSC Examination Result 2025" या लिंकवर क्लिक करा. समोर दिसणाऱ्या रकान्यात आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका आणि "Submit" वर क्लिक करा. समोर दिसणारा निकाल नीट पहा आणि डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ दरम्यान बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. यासाठी राज्यातून ८ लाख १० हजार ३४८ मुले आणि ६ लाख ९४ हजार ६५२ मुलींसह १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. जवळपास गेल्या दोन महिन्यापासून विद्यार्थ्यांना आपला निकाल कधी लागणार याची उत्सुकता होती. त्यानंतर शिक्षण मंडळाने रविवारी ४ मे रोजी अधिकृत प्रसिद्धपत्राकाद्वारे निकाल कधी जाहीर केला जाणार याची माहिती दिली. त्यानुसार बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आज दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना निकाल पाहाता येणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षी पेक्षा १० ते १५ दिवस आधी घेतल्या. त्यामुळे सहाजिकच निकाल देखील मागील वर्षीच्या तुलनेत १० ते १५ दिवसांनी अगोदरच जाहीर करण्यात येणार हे निश्चित होते. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दहावी-बारावीचे निकाल १५ मे पूर्वी जाहीर होतील असे भाष्य केले होते. त्यानुसार तयारी देखील करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

