११ वी प्रवेशासाठी शेवटची संधी; ८ ते १० जानेवारीदरम्यान प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची होणार 'पडताळणी '

राज्य प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, ६ आणि ७ जानेवारी रोजी प्रवेशाबाबत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ८ ते १० जानेवारी या कालावधीत शिक्षण विभाग संबंधित विद्यार्थ्यांशी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधणार आहे.

११ वी प्रवेशासाठी शेवटची संधी; ८ ते १० जानेवारीदरम्यान प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची होणार 'पडताळणी '

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 शैक्षणिक वर्ष २०२५-२६ (Academic year 2025-26) मधील अकरावी प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी (11th Admission Process) करूनही अद्याप महाविद्यालयात प्रवेश घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विभागामार्फत पडताळणी (Student verification through the education department) केली जाणार आहे. राज्यातील कोणताही पात्र विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण उपसंचालक स्तरावर ही विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या उपसंचालक डॉ. सुचिता पाटेकर (Dr. Suchita Patekar) यांनी दिली आहे.

हेही वाचा - मुंबई उच्च न्यायालयातील विविध पदभरती अर्जासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

राज्य प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, ६ आणि ७ जानेवारी रोजी प्रवेशाबाबत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ८ ते १० जानेवारी या कालावधीत शिक्षण विभाग संबंधित विद्यार्थ्यांशी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाची ऑफर असूनही प्रवेश निश्चित केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांची कारणे शोधली जातील. काही विद्यार्थ्यांनी आयटीआय किंवा पॉलिटेक्निक सारख्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असल्याची शक्यता असली, तरी कोणी आर्थिक किंवा इतर कारणांमुळे शिक्षण सोडले आहे का?, याची सखोल चौकशी केली जाणार आहे.

यावर्षी अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत विक्रमी १२ फेऱ्या घेण्यात आल्या. राज्यातील ९ हजार ५५१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २१ लाख ७८ हजार ७८ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ११ लाख ७९ हजार ९२२ विद्यार्थ्यांनी केंद्रीय पद्धतीने, तर १ लाख ७० हजार १०४ विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश घेतले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, अद्यापही राज्यात ८ लाख २८ हजार ५१ जागा रिक्त आहेत. त्यामुळे जागा रिक्त असताना कोणी प्रवेशापासून वंचित राहू नये याची शिक्षण विभाग काळजी घेत आहे. त्यामुळे विद्यार्थी पडताळणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. 

'प्रवेशासाठी अर्ज भरूनही महाविद्यालयात न गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यभरात सुमारे १०० च्या आसपास आहे.  या विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील आणि आवश्यकतेनुसार त्यांना प्रवेश प्रक्रियेत सामावून घेतले जाईल,' असे डॉ. पाटेकर यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत प्रवेशाबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसली, तरी प्रशासनाकडून खबरदारी म्हणून ही पडताळणी केली जात आहे.