पर्यावरण मोहिम! वृक्षारोपण करायला डोंगरावर गेलेल्या ४० विद्यार्थ्यांवर मधमाशांचा प्राणघातक हल्ला
सातारा जिल्ह्यातील कराड येथे पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित सीडबॉल प्रत्यारोपण आणि वृक्षारोपण मोहिमेदरम्यान धक्कादायक घटना घडली. मलकापूर येथील आगाशिव डोंगरावर वृक्षारोपण करण्यासाठी गेलेल्या तब्बल ४० विद्यार्थ्यांवर मधमाशांच्या पोळाने प्राणघातक हल्ला चढवला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सातारा जिल्ह्यातील कराड येथे पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित सीडबॉल प्रत्यारोपण आणि वृक्षारोपण मोहिमेदरम्यान (Tree Plantation Drive) धक्कादायक घटना घडली. मलकापूर येथील आगाशिव डोंगरावर वृक्षारोपण (Tree plantation on Agashiv Hill) करण्यासाठी गेलेल्या तब्बल ४० विद्यार्थ्यांवर मधमाशांच्या पोळाने प्राणघातक हल्ला (Honeybee attack on 40 students) चढवला. या घटनेत मधमाशांच्या दंशामुळे (Bee sting) आणि जीव वाचवण्यासाठी धावताना पडल्याने सुमारे ४० विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात उपचार देण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीचे सुमारे ५० विद्यार्थी शिक्षक व कर्मचाऱ्यांसोबत पर्यावरण जागृती उपक्रमासाठी आगाशिव डोंगरावर गेले होते. वन विभागाच्या कार्यालयामागील परिसरात सीडबॉल प्रत्यारोपण आणि वृक्षारोपण करत असताना अचानक मधमाशांचा पोळ त्यांच्या दिशेने आला. काही क्षणांतच मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याने परिसरात गोंधळ उडाला.
विद्यार्थ्यांनी मधमाशांच्या दंशापासून बचाव करण्यासाठी सैरावैरा धाव घेतली. या धावपळीत अनेक विद्यार्थी घसरून पडले, तर काहींना मोठ्या प्रमाणात दंश झाले. घटनेची माहिती मिळताच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि व्यवस्थापन समितीने तातडीने मदत कार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
सर्व जखमी विद्यार्थ्यांना कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवश्यक उपचार करत त्यांना सुटी दिली. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे शाळेतील पर्यावरण संवर्धन उपक्रमांना तात्पुरता ब्रेक लागला असला तरी, शाळा व्यवस्थापनाने अशा उपक्रमांना भविष्यात अधिक सुरक्षित पद्धतीने राबविण्याचे ठरवले आहे. स्थानिक वन विभागानेही मधमाशांच्या पोळाबाबत जागरुकता वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पर्यावरण जागृतीचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.