संचमान्यतेतील नव्या निकषांविरोधात शिक्षकांचे आंदोलन; हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार

नव्या संचमान्यता निकषांमुळे शिक्षणाची गुणवत्ता घसरण्याबरोबरच शिक्षकांचे अस्तित्व आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित धोक्यात येणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

संचमान्यतेतील नव्या निकषांविरोधात  शिक्षकांचे आंदोलन; हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रस्तावित करण्यात आलेल्या संचमान्यतेच्या नव्या निकषांविरोधात गुरुवारी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 
संचमान्यतेतील नव्या निकषांमुळे शिक्षकांच्या कार्यभारात मोठी कपात होऊन हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता असल्याची चिंता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या निर्णयाचे परिणाम केवळ शिक्षकांपुरते मर्यादित न राहता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या शैक्षणिक व्यवस्थेवरही गंभीर स्वरूपाचे होतील, असे मत शिक्षक प्रतिनिधींनी मांडले.या आंदोलनात पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

आंदोलनादरम्यान देण्यात आलेल्या घोषणांनी आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी परिसर दणाणून गेला. नव्या संचमान्यता निकषांमुळे शिक्षणाची गुणवत्ता घसरण्याबरोबरच शिक्षकांचे अस्तित्व आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित धोक्यात येणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

आंदोलनात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस लक्ष्मण रोडे, पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष  सोपान कदम, पुणे विभाग व पुणे जिल्हा संघटनेचे सरचिटणीस प्राचार्य विक्रम काळे, सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष हरिदास गवळी, विभागीय कार्याध्यक्ष हिम्मत तोबरे यांच्यासह तीनही जिल्ह्यांतील पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

दरम्यान, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षकांचे निवेदन स्वीकारले. शिक्षकांच्या मागण्या व निवेदन शासनापर्यंत सकारात्मकपणे आणि तातडीने पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शिक्षक प्रतिनिधींनी संचमान्यतेतील अन्यायकारक निकष तात्काळ मागे घेण्यात यावेत, प्रचलित पद्धतीनुसार संचमान्यता करण्यात यावी तसेच शिक्षकांची पदकपात होणार नाही, याबाबत शासनाने स्पष्ट शासन निर्णय काढून हमी द्यावी, अशी मागणी केली.यावेळी उपस्थित शिक्षकांनी एकजुटीने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यस्तरीय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.