PMC च्या शैक्षणिक योजनांसाठी १० ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना १५ व २५ हजारांची मदत
पुणे महानगरपालिकेने हद्दीतील २०२६ मध्ये दहावी किंवा बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना यांद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) हद्दीतील २०२६ मध्ये दहावी किंवा बारावीची परीक्षा उत्तीर्ण (Passed 10th and 12th-grade examinations) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना (Bharat Ratna Maulana Abul Kalam Scheme) आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना (Lokshahir Annabhau Sathe Scheme) यांद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागाने ही योजना जाहीर केली असून पात्र विद्यार्थी आणि पालकांना याचा लाभ घेता येईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल आणि ३१ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहील. विद्यार्थी आणि पालकांनी पीएमसीच्या अधिकृत डीबीटी पोर्टलवरून अर्ज करायचा आहे. अर्ज पालकाच्या नावाने ऑनलाइन सादर करणे आवश्यक असून आवश्यक मूळ कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील.

भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. २०२६ मध्ये दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत किमान ८० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना मागासवर्गीय समुदायातील विद्यार्थ्यांसाठी आहे. महापालिका, राज्य शासन किंवा पीएमसी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकतो. यासाठी किमान ७० टक्के गुण आवश्यक आहेत.
४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्के गुणांवर पात्रता मिळेल. तसेच कचरा वेचक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या मुलांना किमान ६५ टक्के गुणांवर योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र दहावीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. मात्र, एका कुटुंबातील केवळ एका विद्यार्थ्यालाच संबंधित योजनेचा लाभ मिळणार आहे.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे प्रमाणित करणारे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे हमीपत्र पीएमसीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी लाभार्थ्याचे आधारशी लिंक असलेले राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते असणे गरजेचे आहे. अर्जातील सर्व माहिती भरल्यानंतर तो औपचारिकरीत्या सबमिट झाला आहे की नाही, याची खात्री करावी. केवळ ड्राफ्ट म्हणून सेव्ह केलेले अर्ज प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
छाननीदरम्यान अर्जात त्रुटी आढळल्यास संबंधित अर्जदाराला निर्धारित कालावधीत आवश्यक दुरुस्ती करावी लागेल. त्रुटी वेळेत दूर न केल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. अर्जासाठी जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उपलब्ध असल्याने पात्र विद्यार्थी आणि पालकांनी शेवटच्या क्षणाची प्रतीक्षा न करता लवकरात लवकर अर्ज करावा आणि आवश्यक सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे अपलोड करावीत, असे पीएमसीने आवाहन केले आहे.