तरुणांनी देश अखंड ठेवून महासत्ता बनवावी : राजेंद्र निंभोरकर

विंग कमांडर विनायक डावरे म्हणाले, पोलीस हे समाजाचे अत्यंत महत्त्वाचे घटक असून कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी ते पार पाडतात. पोलिसांचे शौर्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

तरुणांनी देश अखंड ठेवून महासत्ता बनवावी : राजेंद्र निंभोरकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 युवा पिढीला आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे; मात्र देशाच्या अखंडतेला बाधा आणणाऱ्या घोषणा स्वीकारार्ह नाहीत. स्वातंत्र्यानंतर वर्दीतील ७८ हजार जवानांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले आहे. हे बलिदान भारताचे तुकडे करण्यासाठी नव्हे, तर देश अखंड ठेवण्यासाठी आहे. त्यामुळे देश एकसंध, संघटित आणि महासत्ता बनविण्याची जबाबदारी आता तरुणांच्या खांद्यावर आहे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त नऱ्हे येथील शैक्षणिक संकुलात आयोजित शौर्य पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नागरिकांच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणारे पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस अंमलदार रणजीत पाटील, देवा चव्हाण, पवन माने आणि पोलीस हवालदार निलेश भोरडे यांना आठवा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला.या वेळी विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त), संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते.

निंभोरकर म्हणाले, “भारतीय सेना ही देशातील जनतेची सेना आहे. प्रत्येक नागरिकाला तिचा अभिमान वाटला पाहिजे.” यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या अनुभवांचे कथन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विंग कमांडर विनायक डावरे म्हणाले, पोलीस हे समाजाचे अत्यंत महत्त्वाचे घटक असून कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी ते पार पाडतात. पोलिसांचे शौर्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. राष्ट्रीयत्वाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे काम जाधवर शैक्षणिक संस्था गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, सैनिक आणि पोलिसांनी देशासाठी केलेले कार्य व त्यांचे बलिदान विद्यार्थ्यांना समजावे आणि युवकांना देशसेवेची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने शौर्य पुरस्काराचे आयोजन केले जाते. देशाची बाह्य सुरक्षितता जितकी महत्त्वाची आहे, तितकीच अंतर्गत सुरक्षितताही महत्त्वाची असून ती राखण्यात पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे गेल्या आठ वर्षांपासून समाजात शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शौर्य पुरस्काराने गौरव केला जात आहे. यंदा नागरिकांच्या सुरक्षेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यात आला.