कुत्रा-माणूस संघर्षावर उपाययोजना करा; मुख्याध्यापकांना नवे काम
शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेल्या या परिपत्रकामध्ये ग्रामविकास विभागाच्या 6 ऑगस्ट 2025 रोजीच्या अध्यादेशाचा उल्लेख आहे. "राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत" हा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला होता.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांवरील शालाबाह्य कामांची जबाबदारी वाढत आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे सातत्याने बोलले जाते. मात्र त्यात आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)दिलेल्या निर्देशानुसार मुख्याध्यापकांना नोडल ऑफिसर (Nodal officer for principals)म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यात त्यांना भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव तसेच मानव व श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना (Measures to prevent human-dog conflicts)करण्याचे निर्देश दिले आहेत.
नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, खाजगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या मुख्याध्यापकांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात सुमोटो याचिका दाखल झाली होती.त्यावरील निर्देशानुसार सर्व मुख्याध्यापकांनी अवलोकन करून कार्यवाही करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सूट द्यावी,अशी मागणी सातत्याने केली जाते. त्यातच शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही शिक्षकांवर सोपवली जात आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेल्या या परिपत्रकामध्ये ग्रामविकास विभागाच्या 6 ऑगस्ट 2025 रोजीच्या अध्यादेशाचा उल्लेख आहे. "राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत" हा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने नोडेल ऑफिसर म्हणून नियुक्त करणे आणि राज्य शासनाच्या अध्यादेशाचा संदर्भ असणे यामुळे मुख्याध्यापकांवर सोपवलेले काम करणे त्यांना बंधनकारक होणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध करून विद्यापीठ आवारात व शैक्षणिक संकुलामध्ये कुत्र्यांपासून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व दूरध्वनी क्रमांक सर्वांना उपलब्ध करून द्यावा, असे आदेश दिले गेले होते. त्यातच आता नाशिक येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेले पत्रक चांगलेच व्हायरल होत आहे.
भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव तसेच मानव व श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम आता मुख्याध्यापकांना करावे लागणार आहे. मुख्याध्यापक व विद्यापीठातील अधिकाऱ्यांना आता कुत्र्यांपासून होणारा उपद्रव पाहण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक कामे करावीत की अशैक्षणिक कामांमध्ये स्वतःला गुंतवून घ्यावे,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
